
तमाशा रंगभूमीवरील खलनायक – दादू राणू गायकवाड !! त्यांच्या आईचे नाव, सोनाबाई असून, त्यांना तीन मुलं आणि तीन मुली आहेत.दादू गायकवाड यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून अंगात कला अवगत करून घेतली होती. खलनायकी बोलणे आणि सोंगाड्याची काम करणे ,हे दोन्ही गुण त्यांच्या अंगात संचारले होते. त्यांनी जवळजवळ 25 वर्ष काळूराम मास्तर वेळवंडकर या तमाशा मंडळात काम करून आपले नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पेरले काळूराम या तमाशात खलनायकाची भूमिका केली.त्यानंतर शिवराम बापू बोरगावकर याही तमाशा दोन वर्ष काम केले.तसेच कै.दत्तोबा तांबे शिरोलीकर, रोशन बाई सातारकर, वग सम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर ,भिका भीमा सांगवीकर, शंकरराव कोचुरे ,जगताप पाटील पिंपळेकर आणि मंदा कुंदा पाटील या सर्व तमाशा फडात विनोदी आणि खलनायकी काम करून दोन दोन वर्ष प्रत्येकी तमाशाचा अनुभव घेतला.
त्यानंतर त्यांनी स्वतः सहा वर्ष ओपन पार्टी चालवली. काही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आणि तमाशा फड बंद केला. खरंच त्यांनी 56 वर्षाचं योगदान तमाशा रंगभूमीला वाहिले आहे आणि आजही वाहतात….
हे खूप मोठं भाग्य महाराष्ट्रातील रसिकांना लाभलेल आहे. इतकेच नव्हे तर ,गफूर भाई यांच्याबरोबरही तीन वर्षे तमाशा क्षेत्रात घालवली. त्यावेळी 15 वा महोत्सव झाला. गफूर भाई यांच्याबरोबर त्यांनी पंधरावा महोत्सव सादर केला.
पहिला कार्यक्रम रंगभवन मुंबई येथे झाला, दुसरा कोकण भवन आणि तिसऱा आपल्या दौंडला.. परत चौथा केला जामखेडला आणि पाचवा केला अक्कलकोट..त्याचवेळी रामकृष्ण पाटील मोरे यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र मिळाले आणि मोठ्या उत्साहामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
गायकवाड यांची रहाणी साधी असून, तमाशा क्षेत्रात अतिशय मोलाची कामगिरी केली .आजही ते 81 वर्षाचे आहेत.त्यांनी रायगडची राणी ,संताजी घोरपडे पाटील, ज्या ,त्या खलनायकी पात्राशी आपली भूमिका वटावली. त्यामुळे त्यांचे नाव रसिकांच्या ओठावर टिपल्या गेले.त्यांचा पहाडी आवाज, बोलण्याची ढब, शब्दालंकार, हा काही वेगळाच होता. वगनाट्यात काम करीत असताना, रसिक त्यांच्या विरोधात नेहमीच असायचे हीच त्यांच्या कामाची पावती ठरली.
फड मालकाशी ते अतिशय प्रेमाने वागत…. कलाकारांना जीव लावीत कला सादर करणे, हे त्यांचे ब्रीद ……सोंगाड्या ची भूमिका करीत असताना ,हजरजबाबी विनोद करून ,रसिका मध्ये हास्याचे फवारे निर्माण करीतहोते .इमानदारी हा त्यांचा एक गुण होता, भांडण करणे किंवा रागाने बोलणे, हे त्यांना आवडत नसे.
खरंच ….असे कलावंत रंगभूमीला मिळाले हे आपले भाग्य समजावे लागेल. त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे, आनंदाचे जावो, त्यांच्या हातून रसिकांची या उभ्या महाराष्ट्राची सेवा घडो. त्यांना उदंड आयुष्य लाभो, हीच माते जगदंबेच्या चरणी प्रार्थना……
लेखक – शाहीर खंदारे.
तालुका नेवासा ..
8605558432..

