
पंचनामा प्रतिनिधी) – जारकरवाडी फाटा ते लोणी (धामणी) या प्रमुख मार्गालगतची वाढलेली झाडे व झुडपे संबंधित विभागाकडून अखेर हटविण्यात आल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे अद्यापही कायम असल्याने वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या चार तालुक्यांना जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून दररोज हजारो लहान-मोठी वाहने या रस्त्यावरून प्रवास करतात. तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, नारायणगाव टोमॅटो बाजारपेठ, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती, रांजणगाव-शिक्रापूर एमआयडीसी, अवसरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालय, मंचर- घोडेगाव येथील आयटीआय, बेल्हे येथील समर्थ गुरुकुल यांसारख्या शैक्षणिक, औद्योगिक व व्यापारी केंद्रांकडे जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे.

याशिवाय रांजणगाव गणपती, ओझरचा गणपती, लेण्याद्री गणपती तसेच जेजुरीच्या खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांसाठीही हा रस्ता महत्त्वाचा असल्याने वर्षभर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.
रस्त्यालगतची झाडे व झुडपे हटविल्यामुळे वळणांवरील दृश्य स्पष्ट झाले असून अपघाताचा धोका काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून दुचाकीस्वारांना विशेषतः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून अपघाताची शक्यता वाढली आहे.

त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी वाहनचालक, ग्रामस्थ आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

