
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असलेल्या जारकरवाडी येथे गावातील तरुणांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने गेली अनेक दशके आषाढी बारशीच्या निमित्ताने अन्नप्रसादाचे आयोजन करण्याची अनोखी परंपरा आजही कायम ठेवली आहे. समाजातील एकोपा, धार्मिक भावना आणि सेवाभाव जपणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

यंदाही आषाढी बारशीच्या निमित्ताने गावातील तरुण मंडळ व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने सर्व भाविक आणि ग्रामस्थांसाठी मिष्ठान्न भोजनाचा अन्नप्रसाद आयोजित करण्यात आला. या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच युवक-युवती उपस्थित होते. सर्वांनी अन्नप्रसादाचा लाभ घेत धार्मिक वातावरणात उत्साहाने सहभाग नोंदविला.

या उपक्रमासाठी गावातील नागरिकांनी आर्थिक तसेच वस्तू रूपात मोलाचे सहकार्य केले. आयोजनापासून भोजन व्यवस्थेपर्यंत सर्व जबाबदाऱ्या तरुणांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडल्या. त्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
गावातील सामाजिक ऐक्य, परस्पर सहकार्य आणि धार्मिक परंपरा जपण्याचे उत्तम उदाहरण म्हणून जारकरवाडीच्या या उपक्रमाकडे पाहिले जात असून, भविष्यातही ही परंपरा अशीच अखंड सुरू राहावी, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

