
पंचनामा प्रतिनिधी – मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे गेली कित्येक दिवस बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवार (दि.२२) रोजी रात्री दहा वाजता अतूल मांदळे व संतोष आदक हे मंचर येथे भाजी विक्री करून मांदळेवाडी येथे घराकडे चालले असताना येथील ऊंबरखोरी येथे बिबट्या अगदी रस्त्यालगत ठाण मांडून बसला होता.समोर बिबट्या पाहताच चार चाकी वाहनात बसले असताना सुद्धा त्यांना घाम फुटला.
या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या पावसाचे दिवस असल्याने शेतकरी शेतीच्या कामात मग्न असतो.त्यामुळे बिबटयाच्या वावराने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभागाने येथे पिंजरा लावावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
विशेष म्हणजे येथील उंबरखोरी परीसरात शेळ्या, मेंढ्या व जनावरे दररोज चरण्यासाठी ग्रामस्थ येतात. बिबट्याच्या वावरामुळे त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
या संदर्भात वनविभागाने तात्काळ पाऊले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.बिबटचा दिसला तर त्वरीत वनविभागला कळविण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.असे असले तरी एखादी मोठी घटना घडण्याची वाट वनविभागाने पाहू नये व त्वरीत या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी उपसरपंच रवि ढगे पाटील, ॲड.अशोक पालेकर पाटील व येथील शेतकरी ग्रामस्थांनी केली आहे.

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) उंबरखोरी येथे रस्त्यालगत बसलेला बिबट्या.

