
पंचनामा प्रतिनिधी- समीर गोरडे
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत हुमणी कीड एकात्मिक व्यवस्थापन मोहीम राबवण्यात येत असून तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे,मंडळ कृषी अधिकारी प्रसन्न जाधव,उपकृषी अधिकारी जोरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषी अधिकारी छाया शिंदे यांनी नागापूर येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत किसन शिंदे यांच्या शेतावर प्रकाश सापळा उभारून त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व माहिती दिली. हुमणी कीड बहुभक्षीक असल्याने ऊस, भुईमूग, सोयाबीन, तृणधान्य,भाजीपाला पिकांच्या मुळ्या कुरतडून खाते व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. एल निनो च्या परिणामामुळे पावसात खंड पडण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यातील पहिली पायरी आहे प्रौढ भुंगेरे नष्ट करणे. त्यासाठी सोपा उपाय म्हणजे प्रकाश सापळा. पहिल्या पावसानंतर प्रौढ भुंगेरे जमिनीतून मोठ्या प्रमाणावर सायंकाळी बाहेर येतात अशावेळी कडुलिंब किंवा बाभळीच्या झाडाखाली एक बल्ब (विजेचा किंवा चार्जिंग बॅटरीचा) लावावा. त्याखाली खड्डा करून पिवळा कागद अंथरावा व त्यात पाणी भरावे. त्या पाण्यात डिझेल किंवा पेट्रोल किंवा कीटकनाशक मिसळावे रात्रीच्या वेळी प्रकाशाकडे आकर्षित होणारे हुमणी किडीचे भुंगेरे या पाण्यात नष्ट होतात. एक मादी भुंगेरा साधारणपणे 50 ते 60 अंडी घालते. त्यापासून किमान 50 हुमणीच्या अळ्या तयार होतात. त्यामुळे जर एका प्रकाश सापळ्यात 100 मादी भुंगेरे नष्ट झाले, तर सुमारे 5,000 हुमणी अळ्यांचे नियंत्रण कमी खर्चात होऊ शकते. यामुळे पिकांचे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते. हुमणी किडीच्या प्रभावी व पर्यावरणपूरक व्यवस्थापनासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात प्रकाश सापळ्यांचा वापर करावा, असे आवाहन सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती छाया शिंदे यांनी केले. तसेच घरगुती बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक करून दाखवले. व बीज प्रक्रिया महत्त्व, सापळा पीक, बीबीएफ पेरणी तंत्रज्ञान, शून्य मशागत, मगरारोहयो अंतर्गत फळबाग लागवड, महाडीबीटी पोर्टल वरील योजनांची माहिती दिली. सदर मोहिमेदरम्यान परिसरातील शेतकरी चंद्रकांत शिंदे, नितेश गायकवाड, रेश्मा गायकवाड, अशोक निकम, तबा निकम, रत्ना मंचरे, श्रद्धा शिंदे, सुरज शिंदे उपस्थित होते.




