
पंचनामा प्रतिनिधी – महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेला आणि मंदावलेला मान्सून आता पुन्हा एकदा गती घेणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अहवालानुसार, आगामी २३ ते २५ जून दरम्यान मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय होण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. २५ जून ते १ जुलै या कालावधीत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जूनमध्ये पावसाची ७८% तूट;उकाड्याने नागरिक हैराण –
अरबी समुद्रातील मोसमी वाऱ्यांचे प्रवाह कमकुवत झाल्यामुळे ८ जूनपासून मान्सूनची वाटचाल थांबली होती. परिणामी, जून महिन्याच्या आजवरच्या काळात राज्यात सरासरीपेक्षा तब्बल ७८% कमी पाऊस नोंदवला गेला आहे. पाऊस नसल्यामुळे आणि हवेतील दमटपणा (ह्युमिडिटी) वाढल्यामुळे संपूर्ण राज्यात सध्या तीव्र उकाडा जाणवत असून नागरिक घामाघूम झाले आहेत.







