
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत काढणीपश्चात व्यवस्थापन घटकातील कांदाचाळ आराखड्याबाबत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची कांदाचाळ बांधणीसाठी निवड करण्यात आली होती. मात्र, नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार कांदा साठवणुकीच्या वर 0.60 मीटर अंतर ठेवून छत बांधणे अपेक्षित आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या रचनेमुळे वादळी वारे व मुसळधार पावसात कांदा चाळीचे पत्रे उडून जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सदर आराखड्यात आवश्यक सुधारणा करून जुन्या पद्धतीनुसार कांदाचाळ उभारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आंबेगाव तालुका पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज मागणी संबंधित विभागाकडे केली आहे.

या संदर्भात प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.



