
पंचनामा प्रतिनिधी – श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर कावड यात्रेचा शिरदाळे येथे समारोप करण्यात आला.चैत्र महिन्यात साजरी होणारी ही यात्रा दरवर्षी मोठ्या उस्ताहात संपन्न होत असते.

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथील शेकडो भाविक दरवर्षी मानाची कावड घेऊन या यात्रेला जात असतात.गावातील रणपिसे,सरडे,तांबे,चौधरी,मिंडे, काचोळे मंडळी अतिशय भक्तिभावाने या यात्रेत सहभागी होत असतात.कामदा एकादशीला या यात्रेसाठी शिरदाळे येथील दोन कावडी शिंगणापूरच्या दिशेने प्रस्तान करतात.त्यानंतर त्याठिकाणी मुक्काम करून द्वादशीला शिखर शिंगणापूरच्या मंदिराला कावड पताका दर्शन घेतले जाते.त्यांनतर सर्वांना महाप्रसाद देऊन कावड यात्रा पुन्हा मागे फिरते.

प्रवासात गोंदवलेकर महाराज दर्शन,जेजुरी दर्शन केले जाते.त्यांनतर यात्रा घरी येते.पुढील दहा दिवस कावडीचे मनोभावे पूजा अंगणात केली जाते.

हीच कावड पुढच्या त्रयोदशीला शेतात असलेल्या वनदेव(त्रीलिंगी पिंड) या ठिकाणी नेली जाते.त्याठिकाणी शेकडो वर्षांची असलेली अभिषेखाची परंपरा महादेव भक्त श्री.पांडुरंग रणपिसे यांच्या माध्यमातून केली जाते.त्याठिकाणी सर्वांना अंबिल, घुगऱ्या आणि शिऱ्याचा प्रसाद दिला जातो.त्याठिकाणी पुन्हा कावड नाचवली जाते.गुलालाची उधळण करत तरुण वर्ग कावड नाचावण्याचा आनंद घेत असतात.त्यांनतर गावातील सर्व मंदिरांना प्रदक्षिणा घालून कावड गावातील मुख्य चौकात आणली जाते.ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या चौकात पुन्हा कावड नाचावली जाते.त्याठिकाणी देखील पाणी आणि गुलाल खेळत तरुण आनंद लुटत असतात.त्यामुळे गावातील वातावरण अतिशय भक्तिमय व आनंदी झालेले असतात.

वर्षभर भाविक या कावड यात्रेची वाट पाहत असतात.विशेष म्हणजे ही कावड यात्रा भाविकांना मोफत घडवली जाते.यात रणपिसे,सरडे मंडळींचे मोलाचे योगदान असते.तर गावातील भाविक भक्त देखील स्वइच्छेने या यात्रेसाठी महाप्रसादासाठी मदत करत असतात.

ही यात्रा शेकडो वर्षे सुरू असून आम्ही तरुण देखील यात मोठ्या संख्येने सहभागी असतो असे कावड यात्रा सदस्य श्री.मयुर सरडे यांनी सांगितले.


