
पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात पहाटे थंडी आणि दुपारी कडक ऊन असे संमिश्र वातावरण सध्या दिसून येत आहे. त्यात पहाटे काही अंशी धुक्याचे आणि रासायनिक धुराचे प्रमाण आढळून येत असल्याने या विचित्र वातावरणाचा गावरान आंब्याच्या उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे.आंब्याला आलेला मोहर गळून पडत असून यावर्षी गावरान व कलमी आंबा उत्पादनावर विपरित परिणाम होऊन आंबा उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.


मागील वर्षी मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस थेट नोव्हेंबर पर्यंत सुरू होता. त्यामुळे डिंभे धरणात मुबलक स्वरूपात पाणी साठा उपलब्ध आहे.ज्यामुळे नदी व कालव्याच्या काठावर वसलेल्या गावांना शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. पाण्याची बारमाही उपलब्धता असल्याने आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी कलमी आंब्याच्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. कलमी आंब्याच्या बरोबरीने गावठी आंब्याची देखील मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे.

गावठी आंबा हा कलमी आंब्यापेक्षा आकाराने लहान असला तरी त्यात गोडी जास्त असते असे जुने लोक सांगतात त्यामुळे कलमी आंब्या सोबतच गावठी आंब्याची देखील मोठ्या प्रमाणात लागवड ग्रामीण भागात दिसून येते. मात्र सध्याचे बदलते हवामान या दोन्ही प्रकारच्या आंबा उत्पादनावर विपरित परिणाम करत असून आंबा उत्पादनात या वर्षी घट होण्याची शक्यता आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी पंचनामा न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे.

