
पंचनामा कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव हे महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी वसलेले एक महत्त्वाचे ऐतिहासिक धार्मिक आणि औद्योगिक शहर आहे तसेच सांस्कृतिक दृष्ट्या ही कोपरगावची खास ओळख आहे कोपरगाव ची महाशिवरात्र ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे पूर्वी याच महाशिवरात्र निमित्त महाराष्ट्रातील अनेक नामांकित तमाशा फड येथे येऊन आपली लोककला सादर करून महाशिवरात्रीची शोभा वाढवत असत.
कोपरगावची महाशिवरात्र आणि तमाशा हि एक परंपरा होती. प्रसिद्ध लेखक डॉ. आनंद यादव यांच्या “नटरंग” या कादंबरीत व त्यावरती आधारित “नटरंग” ह्या चित्रपटात देखील कोपरगाव व तमाशा याचा उल्लेख आहे. पूर्वी आठ आठ दिवस महाशिवरात्रीला तमाशाचे खेळ चालत असत व सोमवारच्या आठवडे बाजार दिवशीही तमाशा फड येथे आवर्जून येत असत. कोपरगावच्या लावणी सम्राज्ञी कौशल्याबाई कोपरगावकर व शांताबाई कोपरगावकर या महाराष्ट्रात कुठेही असल्या तरी आपल्या कोपरगावात येऊन आपली कला सादर करत असत.

हा सगळा इतिहास असताना देखील अनेक वर्षापासून मोकळ्या जागेची अडचण, गुंडांचा त्रास यामुळे तमाशाचे कार्यक्रम शिवरात्रला होत नाहीत.
तमाशा व लोककलावंत अभ्यासक अरुण खरात यांनी कोपरगावचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन नम्र विनंती केली आहे की कोपरगावात महाशिवरात्रीच्या पंधरा दिवस चालणाऱ्या उत्सवात नगर परिषद मार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात स्थानिक कलाकारांनाही आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळेल आणि तमाशा कलेला ही संधी देऊन कोपरगावची शिवरात्र व तमाशा हि परंपरा अखंडित चालू करावी व महाराष्ट्र शासन लोककलेच्या जतन, संवर्धन व संगोपन यासाठी करत असलेल्या प्रयत्नात आपलाही वाटा असावा व नामशेष होत चाललेल्या तमाशा कलेला यानिमित्ताने आधार मिळावा तसेच कोपरगाव शहर व तालुक्यातील कलारसिकांना महाशिवरात्र निमित्त मनोरंजनाची मेजवानी मिळावी अशी मागणी केली आहे.

या निवेदनाची प्रत माहितीसाठी व योग्य त्या कारवाईसाठी मा. आमदार आशुतोष दादा काळे साहेब, मा. परागजी संधान साहेब
नगराध्यक्ष — कोपरगाव नगरपरिषद, मा. जितेंद्रभाऊ रणशूर साहेब -उपनगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद यांना देण्यात आली आहे.
