धामणी(ता.आंबेगाव) येथे शिखर कलशारोहन,जिर्णोध्दार सोहळा संपन्न!!
धामणी(ता.आंबेगाव) येथे शिखर कलशारोहन,जिर्णोध्दार सोहळा संपन्न!!
नवीन मंदिरे बांधण्यापेक्षा पुरातन देवस्थानाचा व मंदिराचा जिर्णोध्दार करुन त्यांची दैनदिन पुजा,चांगली स्वच्छता ठेवून ती जतन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. विशालमहाराज हाडवळे यांनी केले.
धामणी (ता.आंबेगाव)येथील शंभर वर्षाहून अधिक वर्षाच्या पुरातन श्री.दत्त मंदिरात वेद मंत्रोच्चारात विधिवत शिखराचे कलशारोहन, जिर्णोध्दार पूर्तता सोहळा उत्साहात बुधवारी (दिनाक २० मार्च) पार पडला.यावेळी वारकरी सांप्रदायातील अनेक मान्यवर व पुणे मुंबईहून आलेले गावकरी व स्थानिक ग्रामस्थ महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धामणी येथील बेरी परिवारांच्या पुरातन श्री.दत्तात्रय मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम पूर्ण झाले असून कलशाचे कलशारोहन करण्याआधी कळसाची धामणीच्या पेठेतून डोक्यावर कळस घेऊन पारंपारिक वाद्याच्या गजरात वाजतगाजत मिरवणूक काढली गेली.रांगोळीच्या पायघड्या, फुलांच्या वर्षावात मिरवणूकीचे स्वागत झाले.विधिवत मंत्रोच्चाराने होमहवन करुन कळसाची पूजा करुन त्यावर संस्कार केले गेले.त्यानंतर जय जय रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्तच्या जयघोषात विधिवत कळसाचे शिखरावर ह.भ,प.विशाल महाराज हाडवळे यांच्या हस्ते कलशारोहन करण्यात आले.
या पुढील कालावधीत पुरातन मंदिरचा जिर्णोध्दार आणि परंपरेचे संवर्धन आवश्यक असून महान संताच्या पदस्पर्शाने पवित्र असलेल्या धामणी येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान व श्रीराम मंदिरासह गावातील सर्व मंदिराचा लोकवर्गणीतून आकर्षक व भक्कम जिर्णोध्दार करुन येथील ग्रामस्थानी समाजापुढे व नवीन पिढीपुढे चांगला आदर्श ठेवलेला असल्याचे गौरवोदगार त्यांनी यावेळी काढले.
संवर्धन केलेल्या मंदिरामध्ये तेथील दैनदिन पूजा स्वच्छता आणि वर्षभरातील धार्मिक उत्सव साजरे करणे,दर्शनासाठी येणार्या भाविकांसाठी अन्नदान करणे ही आपली सर्वाची मोठी जबाबदारी आहे.सद्या विविध क्षेत्रातील व्यक्तीना प्रशिक्षण देण्यासाठी विविध प्रशिक्षण केंद्र,शाळा,काँलेज प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत.परंतु चांगला माणूस घडविण्यासाठी कुठेही असे प्रशिक्षण नाही त्यांचे एकमेव प्रशिक्षण ठिकाण हे आपले कुटुंब व श्रध्दास्थान मंदिर आहे.जे कुटुंब चांगले आहे तेथेच संस्कार आणि माणूसकीचे दर्शन घडते.दत्त महाराज म्हणजे साक्षात सदगुरु असून आपल्या सर्वाच्या आयुष्यात गुरु हे अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे सर्वानी कुलदैवत,कुलदैवता आणि श्रीगुरुच्या उपासनेकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन हाडवळे महाराज यांनी यावेळी केले.
या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदमूर्ती मंदारशास्री क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली वेदमूर्ती ॠषीकेश कुलकर्णी,वेदाचार्य निलेश कुलकर्णी,वेदाचार्य चैतन्य धर्माधिकारी,मुंकुद क्षिरसागर,बाळू बेरी,प्रमोद देखणे यांनी केले.
यावेळी मंदिराचे मुख्य व्यवस्थापक नितीन बेरी,सौ रिना बेरी,हेमंत बेरी,सरपंच सौ.रेश्मा बोर्हाडे,अभिजित बेरी,प्रकाश पाटील,सुभाष तांबे,रमेश जाधव,दिलीप आळेकर,नामदेव वाघचौरे,अरुण विधाटे,बळवंत विधाटे गूरुजी,सरपंच बाळासाहेब विधाटे,पोपट विठ्ठल विधाटे,श्रीकांत विधाटे,सुनिल सासवडे,दत्ता बेरी,सुकुमार बेरी,मोरेश्वर बेरी,सौ.उज्वला बेरी,सौ सुहासिनी बेरी,सौ शोभना बेरी, बेरी कुटुंबिय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.