वादळी पावसाने उघडीप देताच राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या!!
वादळी पावसाने उघडीप देताच राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार गेला असून, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा चटका अधिक आहे. आज (ता. ११) राज्यात उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज असून, कमाल तापमानात ३ ते ४ अंशांची वाढ होणार आहे. तर कोकणात दमट आणि उष्ण हवामान अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
बुधवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ४३.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अकोला येथे ४२.८ अंश, तर धुळे, निफाड, अमरावती, वर्धा येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे गेला आहे. किमान तापमानातही वाढ कायम असून, उन्हाच्या चटक्या बरोबरच उकाड्यात वाढ होत आहे.
बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीपासून दक्षिण आंध्र प्रदेशापर्यंत समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आजपासून (ता. ११) राज्यात मुख्यतः उष्ण कोरड्या हवामानाची शक्यता आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.
बुधवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३६.५ (२४.८), जळगाव ४३.३ (२६.६), धुळे ४१, कोल्हापूर ३३.६ (२३.५), महाबळेश्वर २८.१ (२०.२), नाशिक ३८.८ (२३.७), निफाड ४१ (२४), सांगली ३४.८ (२३.४), सातारा ३५.३ (२३), सोलापूर ३८.४ (२४.९), सांताक्रूझ ३३.९ (२७.२), डहाणू ३५ (२६.५), रत्नागिरी ३३.६ (२६.४), छत्रपती संभाजीनगर ३९.२ (२३.७), नांदेड ४०.६ (२६.२), परभणी ३९ (२७), अकोला ४२.८ (२५.२), अमरावती ४१.२ (२४.३), बुलडाणा ३८.६ (२५.६), ब्रह्मपुरी ४० (२६.२), चंद्रपूर ४० (२६.४), गडचिरोली ४० (२४.८), गोंदिया ३८.८ (२४.५), नागपूर ४०.६ (२४.७), वर्धा ४१.१(२५.७), वाशीम ३८.४ (२५.२), यवतमाळ ४० (२५.७)