
पंचनामा प्रतिनिधी बेल्हे – समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेत रक्षाबंधनाचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. ‘निसर्ग हाच मानवाचा खरा रक्षणकर्ता’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी संकुलातील विविध वृक्षांना राखी बांधून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.
गुरुकुलमधील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राखी निर्मिती कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. रंगीबेरंगी कागद, फुले तसेच विविध कलात्मक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी आकर्षक व सुबक हस्तनिर्मित राख्या तयार केल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून तयार झालेल्या राख्यांमधून त्यांच्या कलागुणांचा सुंदर आविष्कार दिसून आला.
राखी निर्मितीनंतर विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. वृक्ष आपल्याला सावली, फळे, फुले व प्राणवायू देत जीवसृष्टीच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे वृक्षांचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तनिर्मित राख्या रक्षाबंधनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना बांधण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी कलाशिक्षिका दीप्ती चव्हाण तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल ताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रदीप गाडेकर, गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे व क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे व कलागुणांचे कौतुक केले.
‘वृक्षांचे रक्षण म्हणजेच आपल्या भविष्यासाठी संरक्षण’ हा संदेश देणारा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचा हा उपक्रम रक्षाबंधनाच्या संस्कृतीसोबत पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारा ठरला.




