
पंचनामा प्रतिनिधी – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरु असून याद्या परिपूर्णरित्या तयार व्हाव्यात यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे. याद्या परिपूर्ण होण्याकामी राजकीय पक्षांनी देखील निष्ठापूर्वक योगदान द्यावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार शीतल मुळे तसेच जिल्ह्यातील नॅशनल पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट),राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष,शहर प्रमुख, सचिव तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.
श्रीमती कळसकर म्हणाल्या, एकूण ९० लाख ८० हजार गणना अर्ज वितरित करावयाचे आहेत. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रत्येकी दोन सहाय्यक देण्यात आले आहेत. गणना अर्ज वाटपाचे काम २९ जुलै पर्यंत पूर्ण करायचे आहे. या कामात मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमानंतर मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी मतदारांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक घेण्याचे कामही गणना फॉर्म द्यायला जाणारा केंद्रस्तरीय अधिकारी करत आहे. त्यामुळे एकाच पत्त्यावरील मतदार एकाच मतदान केंद्रात येतील.

त्या म्हणाल्या, सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित मतदार, मयत तसेच दुबार मतदार याप्रमाणे माहिती घेण्यामुळे या मतदारांची नावे आपोआपच प्रारूप मतदार यादीत येणार नाहीत. राजकीय पक्षांनी ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या मतदारसंघातील नावे बारकाईने तपासून घ्यावी, त्यामुळे पात्र मतदाराचे नाव यादीत समाविष्ट व्हायचे राहणार नाही असे सांगून कोणत्याही परिस्थितीत गणना फॉर्म वितरणाचे काम २९ जुलै पर्यंत पूर्ण करायचे आहे, त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी सहकार्य करावे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकांचे श्रीमती कळसकर यांनी निरसन केले.

