
पंचनामा विशेष – आयुष्याच्या या नागमोडी प्रवासात आजची परिस्थिती उद्या नसते आणि उद्याची परिस्थीती परवा नसते.. आपल्याला आहे त्या परिस्थितीत बदल करायचा असेल तर त्या परिस्थीती सोबत लढावं लागेल..आणि त्या परिस्थितीला सोपं करायचं असेल तर आपल्या या जीवनाला सर्वप्रथम समजून घ्यावं लागेल. वेळ आपली आहे हवं तर त्या वेळेचं सोनं बनवा अथवा (सोने मे गुजार दो).. त्या वेळेला झोपण्यात वाया घालवा..! सकाळी ऊठल्यानंतर खरंतर आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध असतात..
१) एक तर अजून थोडा वेळ शांत झोपायचं आणि गोड गोड स्वप्नात रममाण व्हायचं.. आणि त्या स्वप्नाचा तसंच झोपेचा मनमुराद आनंद घ्यायचा..
अथवा
२) लगेचच झोपतून उठायचं आणि आपण जी स्वप्न बघितली आहेत त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी कठोर मेहनत करायची…आळस झटकून टाकून लगेच कामाला लागायचं..
Choice will be ourse..!!
आयुष्यातील प्रत्येक सकाळ ही आपल्याला एक “सुवर्णसंधी” देते आणि प्रत्येक संध्याकाळ आपल्याला विचारत असते की तू त्या संधीच काय केलंस..? आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे..
आयुष्यात आपल्याला काही जर वेगळं करायचं असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहावंच लागेल… ज्या दिशेला गर्दी असेल त्याच्या विरुद्ध दिशेच्या मार्गावरून जावं लागेल.. गर्दी तुम्हाला साहस देते परंतू तुमची ओळख काढून घेते…! जोपर्यंत आपण ध्येयाच्या सीढीवर पोहचत नाही तोपर्यंत हार मानायची नसते.. आणि धरलेला रस्ता कधीच सोडायचा नसतो.. कारण पर्वताच्या बाहूतून निघालेल्या नदीने आजपर्यंत कधीच कुणालाच विचारले नाही की “समुद्र कीती लांब आहे.. किंवा कोणत्या दिशेला आहे”… ती फक्त सातत्याने वाहत असते.. न थांबता..न थकता आपले ध्येय गाठेपर्यंत.

मुंगी ही स्वतःच्या १५० पट ओझं उचलते..जिद्दीचं ज्वलंत उदाहरण ती आपल्यासमोर ठेवते..काम किती अवघड याची कधीच काळजी नसावी आपण कीती करू शकतो यावर मात्र श्रद्धा असावी.. तीच छोटीशी मुंगी जेंव्हा दाणे घेऊन भिंतीवर चढते..तेंव्हा एकवेळ नाहीतर १०० वेळा खाली पडते.. तरीपण शेवटपर्यंत ती आपले प्रयत्न सोडत नाही.. आणि शेवटी तीची मेहनत वाया जात नाही..ती आपलं काम पूर्ण करूनच मग थांबते..म्हणूनच त्या मुंगी पासून मेहनत नक्कीच शिकायला हवी…कधी जय मिळेल, तर कधी पराजय पण मिळेल, कधी अनुभव मिळेल पण केलेल्या प्रत्येक प्रयत्नांच फळ नक्कीच मिळेल. मधमाशीची दृष्टी ठेवा फुलांची कधीच कमी नाही… मधमाशीच्या पोळयांसाठी कोणतीच रोजगार हमी नाही..! त्या मधमाशीला सगळीकडे फुलंच दिसतात काटे असले तरी तीचं लक्ष हे फक्त फुलांतील त्या मधावरचं असतं.. तसंच आपणही आयुष्यात फक्त संधीच शोधायच्या..अडचणी, अपयश, टोमणे यांचे काटे नेहमीच टोचत राहतील..पण फुलांची म्हणजेच संधीची कधीच कमतरता नसते.. फक्त आपली दृष्टि सकारात्मक ठेवली की या जगात फुलांची म्हणजेच संधीची कधीच कमतरता नसते..फक्त ती शोधायची नजर मात्र आपल्याजवळ असायला हवी.. साधं पिंपळाच रोप असतं ते कुठल्याही पाषाणावर लगेच उगवतं..म्हणूनच म्हटलंय पिंपळाच्या पानासारखंच पाषाणावर टिकलं पाहीजे..
पाण्याचा अर्धा भरलेला ग्लास असतो.. तो कुणाला अर्धा भरलेला दिसतो तर कुणाला “अर्धा रिकामा” दिसतो.. जशी दृष्टी तशी सृष्टी..
कवी विंदा करंदीकरांनी आपल्या कवितेत म्हटलंय की..
“असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर..नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर”..!
“पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना अन् हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना”..
शेवटी त्यानी असंही म्हटलंय की..“करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवटचा देताना..”
यशाच्या उंच उंच शिखरावर पोहचल्यावरही माणसाने जमीनीला कधीच विसरू नये..कारण जास्तच उंच गेलेली इमारत कधी कोसळून पडेल हे सांगता येत नसते..म्हणूनच आयुष्यात येऊन माणसाने पैसे थोडे कमी कमावले तरी काही हरकत नाही.. पण माणसं मात्र नक्कीच कमवावीत..मित्रांचा ठेवा जरुर कमवावा..!! तोच आपल्या जीवनप्रवासातील मेवा आहे..
निळकंठ बाबाराव पाटील मैलापूरे, कारेगावकर..
छत्रपती संभाजीनगर
मो. नं. – 9881084320


