
पंचनामा प्रतिनिधी -आंबेगाव तालुक्यातील पारगाव, दत्तात्रयनगर येथे भीमाशंकर सहकारी कारखान्याच्या पूर्वेला राहणाऱ्या संतोष बबन ढोबळे यांच्या शेतात मुक्कामासाठी असलेल्या बापू शिंदे व बबन शिंदे यांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला होता.बिबट्याच्या या हल्यात दीड वर्षीय घोडीचा मृत्यू झाला होता.
या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी केली होती. या मागणीला वन विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत घटनास्थळी पिंजरा लावला आहे.

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, संतोष ढोबळे, वन विभाग कर्मचारी अशोक जाधव, रामदास वळसे उपस्थित होते.
मागणीची तत्काळ दखल घेतल्याबद्दल वनविभागाच्या वन मंडळ अधिकारी नीलम चव्हाण यांचे ग्रामस्थानी आभार मानले आहेत.


