
अवसरी फाटा (ता.आंबेगाव ) ते जांबुत ( ता.शिरूर ) या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरणाचे काम सध्या सुरू असून, या कामासाठी राज्य शासनाकडून तब्बल ४१८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अवसरी–निरगुडसर परिसरात सुरू असलेले काम अतिशय संथ गतीने व ठेकेदाराच्या सोयीनुसार होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रस्त्याचे खोदकाम करताना ज्या ठिकाणी मुबलक मुरूम उपलब्ध आहे त्या भागात मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जात आहे. मात्र दोन्ही बाजूंनी समान प्रमाणात काम न करता एकाच बाजूने अधिक रस्ता उकरला जात असल्याने त्या बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ज्या ठिकाणी मुरूम कमी आहे त्या ठिकाणी काम टाळले जात असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, निरगुडसर परिसरातील एका भागात सुमारे दीडशे मीटर अंतराचा रस्ता अचानक चार ते पाच फूट उंच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या भागाच्या पुढे आणि मागे रस्त्याची पातळी पुन्हा खाली करण्यात आली आहे. त्यामुळे नेमका हा छोटाच भाग एवढ्या उंचीवर का नेण्यात आला, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम व नाराजी निर्माण झाली आहे.

स्थानिकांच्या मते, कोणतेही योग्य नियोजन किंवा ग्रामस्थांशी चर्चा न करता हा भाग उंचावण्यात आल्याने रस्त्याची रचना विस्कळीत झाली आहे.या उंचावलेल्या रस्त्यामुळे लगतची घरे चार ते पाच फूट खोल गेल्यासारखी दिसत असून,नागरिकांना घरातून थेट रस्त्यावर येणे अत्यंत कठीण झाले आहे.अनेक ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने घराबाहेर काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.
उंच चढावरून वाहन काढताना तोल जाऊन काही नागरिक दुचाकीवरून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, वारंवार होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच संबंधित ठेकेदाराने तातडीने लक्ष घालून रस्त्याचे काम नियोजनबद्ध व सुरक्षित पद्धतीने करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या संथ गतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या धूळीमूळे मात्र येथील ग्रामस्थ जाम वैतागले आहेत. रस्त्याने जाणार्या वाहानाची धूळ मात्र घरात पसरली जात असून गृहिणींना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. धूळ उडू नये म्हणून रस्त्यावर पाणी मारले जाते. मात्र पाणी रस्त्यावर दिसत नाही फक्त पाणी मारण्याचा देखावा केला जातो. कारण पाणी मारताना जर वाहान गेले तरीही धूळ उडते. रस्ता कधीही पूर्ण करा पण धूळीचा बंदोबस्त करा अशी प्रतिक्रिया येशील महिलांनी व्यक्त केली आहे.
निरगुडसर ( ता.आंबेगाव) येथील परिसरात सुमारे चार ते पाच फूट खोल गेलेली घरे.




