
पंचनामा प्रतिनिधी – मंचर (ता.आंबेगाव ) येथील अणासाहेब आवटे कॉलेजची घंटा वाजली पुन्हा छत्तीस (३६ वर्षे ) वर्षांनी, औचित्य होते माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा !! छत्तीस वर्षांनी विद्यार्थी पुन्हा बेंचवर बसले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने व प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राष्ट्रगीत व प्रतिज्ञा घेतली. दिप प्रज्वलन करून सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांनी टाळ्यांच्या गजरात एकमेकांचे स्वागत केले.
या कार्यक्रमानिमित्त बी.ए.ला अध्यापन करणारे मा. प्राचार्य. आय.बी जाधव यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व जुन्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा देताना नकळत मन भरून येत होते.

विद्यार्थ्यांनी छत्तीस वर्षांपूर्वीच्या वेगवेगळ्या आठवणी सांगितल्या. कॉलेज नंतर जीवनात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काही विद्यार्थी भारतीय लष्करात भरती झाले. तर काही विद्यार्थी शिक्षक झाले. कोणी अधिकारी बनले कुणी कार्पोरट क्षेत्रामध्ये तर काही शेती करत राहिले. सर्वांनी आपल्या यशामध्ये शिक्षकांचा वाटा असल्याचे आवर्जून सांगितले.
आपापल्या जीवनात सर्व व्यस्त असतानाही सर्वांना एकत्र आणण्याचे काम देवीदास हुले, कांताराम भोंडवे, कांताराम टाव्हरे, सुमन फलके, संजना टाकळकर यांनी केले.
आपण घडलेल्या कॉलेजमध्ये सर्वांनी मिळून आठ हजार रुपयांचे ज्ञानेश्वरांचे पसायदान फ्रेम कॉलेजला भेट दिली.
यावेळी माजी प्राचार्य आय. बी.जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी अण्णासाहेब आवटे कॉलेजचे प्रा.राहूल गावडे व त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू आढळराव यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. अरूण गोरडे यांनी केले, आभार निलेश सैद यांनी मानले.
कार्यक्रमानंतर गोड भोजनाचा आस्वाद घेऊन एकमेकाचा निरोप घेताना नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्याचे जाणवले जड अंतकरणाने पुन्हा आपण भेटू व एकमेकांच्या संपर्कात राहू असे एकमेकांना आश्वासन देऊन जड अंतकरणांनी निरोप घेतला .

मंचर (ता.आंबेगाव ) येथे अण्णासाहेब आवटे कॉलेज मध्ये जमलेले माजी विद्यार्थी.


