
पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील पुरातन श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात (दि.३ मार्च ) फाल्गुन पौर्णिमा (धुलीवंदन) निमित्ताने गाभार्यात फुलांची आकर्षक सजावट करुन स्वयंभू सप्तशिवलिंगाची पारंपारिक श्रीखंड पूजा करण्यात आली.यावेळी सेवेकरी,भाविक,ग्रामस्थ उपस्थित होते.

झेंडू,अष्टर,फुलांनी केलेली गाभार्यांची सजावट,स्वयंभू सप्तशिवलिंगाला केलेला सुवासिक अत्तर व केशरमिश्रित भंडार्याचा लेप व त्यावर सप्तरंगाची उधळण करण्यात आली व वस्रालंकाराने सजवलेली खंडोबा,म्हाळसाई व बाणाईची लोभस मूर्ती पाहून उपस्थित भाविक सुखावल्याचे पाहायला मिळाले.

पहाटे धामणीच्या खंडोबा देवस्थान मंदिर व परिसरात कपाळभर भंडारा लावून सदानंदाचा येळकोटचा जयघोष करुन भल्या पहाटे अनिकेत पोखरकर व सौ.मोनिका पोखरकर (वडगांवपीर) दत्तात्रय जयवंत जाधव व सौ.पूजा जाधव (धामणी) रामदास पांडुरंग जाधव व सौ संगिता जाधव (धामणी) प्रसाद विधाटे व सौ सानिका विधाटे (धामणी) आनंदराव चिंतामण जाधव व सौ प्रतिक्षा जाधव (धामणी) मच्छिंद्र आमाप व सौ बेबी आमाप (धामणी) हनुमंत नानासाहेब विधाटे व सौ.वर्षा विधाटे (धामणी) नारायण लक्ष्मणराव बोर्हाडे व सौ मंगल बोर्हाडे (धामणी) अंकुश बढेकर व सौ.कविता बढेकर (धामणी) या नऊ जोडप्यांच्या हस्ते स्वयंभू सप्तशिवलिंगाला दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक घालण्यात आला.

त्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत,प्रभाकर भगत,सुभाष तांबे,नामदेव भगत,शांताराम भगत,राजेश भगत,पांडुरंग भगत,ज्ञानेश्वर भगत,अनिरुध्द वाळूंज,बाळशिराम साळगट यांनी स्वयंभू सप्तशिवलिंगाची पारंपारिक पूजा बांधून व शिवलिंगावर व खंडोबा,म्हाळसाई,बाणाईच्या मूर्तीवर सप्तरंगाची उधळण करुन श्रीखंडाचा नैवेद्य दाखवण्यात येऊन त्यानंतर आरती होऊन दर्शनासाठी मंदिर भाविकांना खुले करण्यात आले.

रुद्राभिषेक पूजेचे पौरोहित्य प्रमोद देखणे यांनी केले.यावेळी खंडोबाचे दर्शनासाठी व तळीभंडारा करण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केलेली होती.मंदिराच्या गाभार्यातील आकर्षक फुलांची सजावट महिला भाविक सौ पूजा जाधव व सचिन व सौरभ जाधव यांच्या सौजन्याने करण्यात आल्याचे सेवेकर्यांनी सांगितले.

यावेळी देवाच्या अभिषेकाला बसलेल्या नऊ यजमान मानकर्यांचा देवस्थानाच्या वतीने सत्कार करण्यात आला .
फाल्गुनातील पारंपारिक श्रीखंड पूजेचे महात्म्य फाल्गुन महिण्यात येणारी पौर्णिंमा ही हिंदू वर्षातील शेवटची पौर्णिमा असून ती होळी व धुलीवंदन सणाशी संबधित आहे.आध्यात्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंन्त महत्वाची मानली जाते.फाल्गुन पौर्णिमा म्हणजे वाईट गोष्टीचा नाश आणि भक्तिचा विजय म्हणून ओळखला जातो.या दिवशी हिवाळ्याचा निरोप आणि नवचैतन्याची चाहूल देणार्या वसंत ॠतुच्या आगमनाचे संकेत देत असतो.

खंडोबाच्या श्रीखंड पूजेची कथा”मल्हारी महात्म्य”या ग्रंथात सांगितलेली आहे.जेव्हा श्री शंकराने मल्हार मार्तंड अवतार धारण करुन मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा वध केला.त्यांच्या या महान कार्यामुळे देव.ॠषी.व मुनी व तमाम भक्तजन संकटातून मुक्त झाले.या घटनेच्या स्मरणार्थ भक्तजनांनी पुढाकार घेऊन श्री कुलस्वामी खंडेरायाला दहीभात व श्रीखंडाचा नैवेद्य अर्पण केला ही प्रथा आजही चंपाषष्ठीच्या व फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी आवर्जुन पाळली जाते.ज्यात खंडोबाच्या उपासनेत ठोंबरा.भंडारा व झेंडूच्या फुलासह श्रीखंड खंडोबाला अर्पण करतात.त्यामुळे कुलदैवताचा आशिर्वाद मिळतो.आणि कुटुंबातील अन्नधान्याची व आरोग्याची शुध्दता व आर्थिक समृध्दी कायम राहाते अशी पारंपारिक निस्सीम श्रध्दा असल्याचे सेवेकरी मंडळीनी यावेळी सांगितले.



