
पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – सलग पंचवीस वर्षे महाराष्ट्र विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करणारे व अभ्यासू पत्रकार म्हणून महाराष्ट्रातील पत्रकारितेत वेगळा ठसा उमटवणारे दैनिक सामनाचे विशेष प्रतिनिधी विठ्ठल जाधव यांना यंदाचा राज्यस्तरीय शंकर पाटील गुंफण पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे सातारा जिल्ह्यातील अग्रगण्य व्यासपीठ मानल्या जाणाऱ्या गुंफण अकादमीच्या वतीने पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोथरूड (पुणे) येथे गुंफण अकादमी व भारतीय शिक्षण संस्था (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी दिली.
विठ्ठल दत्तात्रय जाधव हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ, अभ्यासू, निर्भीड आणि विश्लेषक पत्रकार म्हणून ओळखले जातात. सुरुवातीला चार वर्षे लोकसत्तामध्ये पत्रकारिता केल्यानंतर गेल्या ३० वर्षांपासून ते दैनिक सामना, पुणे येथे विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. या कालावधीत महाराष्ट्र विधिमंडळाच्या मुंबई व नागपूर येथे झालेल्या अधिवेशनांचे सलग पंचवीस वर्षे सातत्यपूर्ण वार्तांकन हे त्यांच्या पत्रकारितेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य राहिले आहे. यासोबतच राज्यभरातील मोठ्या राजकीय सभा, जनआंदोलने, शेतकरी चळवळी व निवडणुका यांचे प्रभावी व अभ्यासपूर्ण वार्तांकन लक्ष्यवेधी ठरले आहे. राजकारण, शेती, सहकार, जिल्हा परिषद, महसूल विभाग तसेच विविध प्रशासकीय कार्यालयांमधील बातमीदारी, मुलाखती, लेखन आणि संपादनाचा त्यांना प्रदीर्घ व व्यापक अनुभव आहे.
त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठीही महाराष्ट्र विधिमंडळाचे समालोचन व वृत्तांत सादर केले आहेत. राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकराज्यसह विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. यासोबतच पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र व संज्ञापन पत्रकारिता विभागामध्ये मार्गदर्शन व्याख्याते म्हणून त्यांनी योगदान दिले आहे.
संघटनात्मक पातळीवरही विठ्ठल जाधव यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपद, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे कार्यवाहपद तसेच महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे जनरल सेक्रेटरीपद भूषविले आहे. राज्य सरकारच्या अधिस्वीकृती समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले असून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. ते पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे विश्वस्त असून राज्य सरकारच्या रस्ते सुरक्षा समितीचे तसेच पुणे विभागीय स्वच्छता अभियान समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे.

याशिवाय अनेक संस्था, संघटना व ट्रस्टमध्ये त्यांनी पदाधिकारी म्हणून सक्रिय योगदान दिले आहे. पत्रकारितेतील उल्लेखनीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील कार्याबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत.
