
पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – लोणी ( ता.आंबेगाव) येथील बागवस्ती व वाफगाव रस्ता डोंगर भाग,खंडोबा डोंगर भाग या परिसरात ज्वारी,बटाटा, कांदा,भूईमूग आदि पिके जोमात आली असताना वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
डोंगराळ भागाची भौगोलिक रचना,दाट झाडी आणि सुरक्षित दडण मिळल्यामुळे रानडुकरे,तरस,कोल्हे,हरणे या प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून हे प्राणी टोळ्यांनी येऊन शेतात धुडगूस घालत आहेत.
मे महिन्या पासून चांगला पाऊस झाल्याने शेतकर्यांनी योग्य अंदाज घेऊन पिकांची लागवड व पेरणी केली आहे.सध्या हि पिके जोमात आली आहेत.मात्र रानटी प्राणी सतत शेतात घुसून ज्वारी,बटाटा,कांदा,भूईमूग पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस करत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे.

आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करून पहात आहेत. शेतमालाचे उत्तरलेले बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आणि त्यातच रानटी प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे समस्या अधिकच तीव्र झाली आहे.या परिस्थितीत वन विभागाने तातडीने लक्ष घालून रानटी प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रगतशील शेतकरी व पोलिस पाटील संदिप आढाव, बाळासाहेब आढाव, दतात्रय वाघोले व येथील शेतकर्यांनी केली आहे.


