अष्टविनायक व बेल्हा जेजुरी रोडवरील दिशादर्शक फलकावर श्री क्षेत्र खंडोबा धामणीच्या नावाचा उल्लेख व्हावा!!
अष्टविनायक व बेल्हा जेजुरी रोडवरील दिशादर्शक फलकावर श्री क्षेत्र खंडोबा धामणीच्या नावाचा उल्लेख व्हावा!!
आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातुन अष्टविनायक व बेल्हा जेजुरी हे दोन महामार्ग जातात.नव्याने तयार झालेल्या या महामार्गावरून रोज रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर वाहतुक होत आहे.
तालुक्याच्या पुर्व भागातील धामणी गावामध्ये ऐतिहासिक पौराणिक महत्व असणारे खंडोबा देवाचे सुप्रसिद्ध असे म्हाळसाकांत खंडोबा मंदिर आहे.माघ पोर्णिमेला भरणारी यात्रा संपूर्ण पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध आहे. यात्रेदरम्यान ४-५ लाख भाविक धामणी खंडोबाचे दर्शनाला येत असतात.
धामणीचा खंडोबा हा आसपासच्या अनेक गावातील त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा , तसेच संगमनेर परिसरातील अनेक लोकांचे कुलदैवत आहे.तसेच संगमनेर, सिन्नर, नाशिक वरुन अनेक भाविक व खंडोबा देवाच्या पालख्या जेजुरी ला जात असतात.नव्याने तयार झालेल्या अष्टविनायक व बेल्हा जेजुरी रस्त्यावरुन या पालखी जात असतात जर तेथिल फलकावर धामणी च्या खंडोबा चा उल्लेख असेल तर भाविकांना माहिती मिळुन दर्शन घेता येईल.
पारगाव वरुन भिमाशंकर कारखान्याकडे जाताना जो दिशादर्शक फलक आहे त्यावर व बेल्हा जेजुरी रस्त्यावर रोडेवाडी फाटा येथील फलकावर श्री क्षेत्र खंडोबा धामणी या नावाचा उल्लेख करावा व लोणी येथे नविन फलक बसवावा त्यावर खंडोबा मंदिर व मंचर,अवसरी, पारगाव आणि इतर गावांचा पण उल्लेख करावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, मा. सरपंच अनिल डोके, उपसरपंच संतोष करंजखेले, मा. सरपंच सागर जाधव, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे यांनी केली आहे.
पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांनी बोलताना सांगितले की अष्टविनायक व बेल्हा जेजुरी या दोन्ही महामार्गावर “श्री क्षेत्र खंडोबा धामणी” या नावाचा उल्लेख व्हावा कारण धामणी खंडोबा देवस्थान सुप्रसिद्ध आहे व त्या फलकावर सदरचा उल्लेख नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे त्यामुळे “श्री क्षेत्र खंडोबा धामणी” नावाचा उल्लेख करावा या मागणीसाठी लवकरात लवकर महामार्ग अधिकाऱ्यांना भेटुन निवेदन देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे मा.सरपंच अनिल डोके यांनी सांगितले की जर दोन्ही महामार्गावर”श्री क्षेत्र धामणी खंडोबा” हा उल्लेख झाला तर भाविकांना याचा फायदा होईल. धामणी खंडोबाचा उल्लेख “जय मल्हार” मालिकेत असल्याने धामणी खंडोबाचे महत्त्व वाढलेले आहे व भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.