लोणी धामणी परिसरात कोरडा दुष्काळ जाहीर करा- मा. पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांची मागणी!!
लोणी धामणी परिसरात कोरडा दुष्काळ जाहीर करा- मा. पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांची मागणी!!
लोणी धामणी परिसरात पावसाने दडी मारल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. संभाव्य दुष्काळाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी शासनाने या परिसराची पाहणी करून नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व पाणी, मागेल त्याच्या हाताला काम आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीत करावयाच्या उपायोजनांचा आराखडा तयार करावा अशी मागणी मा. पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले यांनी केली आहे.
पावसाळा सुरू होऊन निम्म्याहून जास्त कालावधी लोटला आहे तरी देखील आंबेगाव तालुक्यातील लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळवाडी, पहाडदरा, शिरदाळे आदी गावे मात्र ऐन पावसाळ्यात दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहेत. ऐन पावसाळ्यात या परिसरात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने केलेली पेरणी वायला जाणार आहे.दुबार पेरणीचे मोठे संकट या परिसरातील शेतकऱ्यांवरती आहे. त्यामुळे या परिसरात ताबडतोब कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी आग्रही मागणी मा.पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले,शिवसेना उपतालुकाप्रमुख महेश वाघ, वडगावपिरच्या सरपंच मीरा पोखरकर, मांदळेवाडी ग्रामपंचायत सदस्य ज्योती गोरडे, लोणी गावच्या सरपंच उर्मिला धुमाळ, धामणी गावच्या सरपंच रेश्मा बोराडे, शिरदाळे गावच्या सरपंच जयश्री तांबे यांनी केली आहे.
या परिसरात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामुळे या परिसरातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. ऐन पावसाळ्यात या गावात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागतो आहे. कमी प्रमाणात पाऊस झाल्याने चारा देखील उपलब्ध झालेला नाही. दुबार पेरणीचे संकट पुढे असताना पेरणी करण्यासाठी पैसा आणायचा कुठून? हा मोठा प्रश्न येथील शेतकरी वर्गासमोर आहे.
शासनाने दुबार पेरणीसाठी मोफत बी- बियाणे, खते, औषधे उपलब्ध करून द्यावी तसेच शेतकऱ्यांना मोफत पीक विमा योजना लागू करून त्यातील जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात, शेतकऱ्यांच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी अर्थसहाय्य योजना राबवावी आदी मागण्या समोर येत आहेत.