
पंचनामा प्रतिनिधी मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने ताण दिल्याने खरीप हंगामातील पिके सुकू लागली आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत असून, उपलब्ध पाण्याच्या जोरावर पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल किंवा अन्य पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत, ते शेतातील पिकांना पाणी देत आहेत. काही शेतकरी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार घेत आहेत. मात्र, ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
एकीकडे पावसाची अनिश्चितता, तर दुसरीकडे शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यातच रासायनिक खते, कीटकनाशके तसेच विविध औषधांच्या दरात वाढ झाल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढता खर्च आणि मिळणारा अपुरा बाजारभाव यामुळे शेती करणे दिवसेंदिवस जिकिरीचे होत असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
नैसर्गिक संकटांसोबतच वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावाची अनिश्चितता अशा मानवनिर्मित समस्यांनाही शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची चिंता वाढली आहे. पावसाने लवकर हजेरी लावून पिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा पूर्व भागातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.


