
पंचनामा प्रतिनिधी – राज्यात सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या दूध भेसळ टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि एफ.डी.ए. (F.D.A.) च्या पथकाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे.या धडक कारवाईत तब्बल अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,एकूण १३ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, सांगली आणि भिवंडी अशा तब्बल ६ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.पुण्यातील मंचर येथील दोघांना अटक केल्यानंतर या संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे हाती लागले.गेल्या दोन वर्षांपासून हा काळा धंदा राजरोसपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.भेसळीचा हा प्रकार इतका भयानक होता की,वास न येणारा शाम्पू, दुधाची पावडर आणि केमिकल पाण्यात मिसळून ही भेसळ केली जात होती.५०० लीटर शुद्ध दुधात ३०० लीटर तर १००० लीटर दुधात तब्बल ५०० लीटर केमिकलचे पाणी मिसळले जायचे.हेच विषारी दूध पुढे नामांकित डेअरी कंपन्यांना पुरवले जायचे,ज्यापासून विविध दुग्धजन्य पदार्थ बनायचे आणि घरोघरी दुधाच्या पिशव्यांमधून ते आपल्या मुलाबाळांपर्यंत पोहोचायचे.पुणे ग्रामीण पोलिसांच्या २५ आणि एफ.डी.ए.च्या २० अधिकाऱ्यांच्या पथकाने ही मोठी कामगिरी चोख बजावली आहे.या रॅकेटमध्ये आणखी बड्या लोकांचा सहभाग असण्याची शक्यता असून,पोलीस सध्या त्या दृष्टीने सखोल तपास करत आहेत.अशा नराधमांवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.

