
पंचनामा प्रतिनिधी – पारगाव गावठाणालगत असलेल्या घोड नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक सूचना फलक नाहीत. त्यामुळे येथे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सूचना व इशारा फलक उभारावेत, अशी मागणी पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी केली आहे.





याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदन देण्यात आले आहे. त्यानुसार अष्टविनायक महामार्गावरील घोड नदीवरील पुलाच्या शिंगवे गावाकडील बाजूस तीव्र उतार व वळण आहे.या ठिकाणी वाहनचालक भरधाव वेगात असतात. दुसरीकडे या परिसरात सकाळी व सायंकाळी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे पुलाजवळ वेगमर्यादा,अरुंद पूल तीव्र वळण, उतार आणि शाळकरी विद्यार्थ्यांची वर्दळ दर्शविणाऱ्या फलकांची गरज आहे. ते नसल्याने येथील स्थितीचे वाहनचालकांना गांभीर्य लक्षात येत नाही, असे विठ्ठल ढोबळे यांच्यासह ग्रामस्थ, नागरिकांनी स्पष्ट केले. आता प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी केली आहे.

पारगाव ता आंबेगाव येथील घोड नदी वरील पूल अरुंद धोकेदायक असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे



