
पंचनामा प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात धडक कारवाई सुरू केली आहे. पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथे सलग दोन दिवसांत करण्यात आलेल्या कारवाईमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणारे, निकृष्ट दर्जाचे तूप आणि खवा तयार करणारे तसेच रसायनांचा वापर करून फळे पिकवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मंगळवारी, २६ मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे रसायनांचा वापर करून पिकवण्यात आलेले सुमारे ८०० किलो आंबे जप्त करण्यात आले. या आंब्यांची किंमत जवळपास २० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये निकृष्ट दर्जाचे गायीचे तूप जप्त करण्यात आले. या कारवाईत तब्बल ४० हजार ९६० रुपयांचे तूप जप्त करण्यात आले असून संबंधितांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
बुधवारी, २७ मे रोजी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे २१५ किलो निकृष्ट दर्जाचा खवा जप्त करण्यात आला. या खव्याची किंमत सुमारे ४७ हजार ३०० रुपये असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
“भेसळयुक्त, निकृष्ट आणि आरोग्यास अपायकारक अन्नपदार्थ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. ग्राहकांना दर्जेदार, सुरक्षित आणि रसायनमुक्त अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार आहे,” असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय प्रशासनासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीनंतर FDA विभागात मोठ्या प्रमाणात साफसफाई आणि कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यभरात बनावट औषधे, अन्नभेसळ, परवान्यांमधील गैरव्यवहार आणि ऑनलाइन औषध विक्री यांसारख्या गंभीर प्रश्नांवर आता अधिक कठोर नियंत्रण येण्याची शक्यता आहे.
सामान्य नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत केले जात असून “जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी” अशी मागणीही जोर धरत आहे. सध्या FDA विभागाची ही धडक कारवाई राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.
