
पंचनामा विशेष – आज भारतासह संपूर्ण जगासमोर उभ्या असलेल्या गंभीर समस्यांपैकी भ्रष्टाचार ही एक मोठी समस्या बनली आहे. देश कितीही प्रगती करत असला तरी भ्रष्टाचारामुळे सामान्य माणसाचा तसेच गावांच्या विकासाचा वेग मंदावत असल्याचे चित्र दिसत आहे. लाचखोरी, गैरव्यवहार, सत्तेचा गैरवापर आणि स्वार्थासाठी नियम मोडणे यालाच भ्रष्टाचार असे म्हटले जाते.
आज अनेक सरकारी कार्यालयांमध्ये साधे काम करून घेण्यासाठीही सामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. काही ठिकाणी पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गरीब आणि प्रामाणिक माणूस अधिक त्रस्त होत आहे. शासनाच्या अनेक योजना कागदावरच राहतात आणि त्याचा फायदा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नाही. गावांच्या विकासासाठी येणारा निधीही अनेक वेळा योग्य कामांवर खर्च न होता मध्येच गायब होतो.
भ्रष्टाचारामुळे गावातील रस्ते, पाणीपुरवठा, शाळा, आरोग्य सुविधा आणि इतर विकासकामांवर मोठा परिणाम होत आहे. निकृष्ट दर्जाची कामे केली जातात आणि काही दिवसांतच रस्ते उखडले जातात. त्यामुळे सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गावाचा विकास थांबतो आणि जनतेचा शासनावरील विश्वास कमी होतो.
भ्रष्टाचाराचा परिणाम केवळ आर्थिक नाही तर सामाजिक आणि नैतिक मूल्यांवरही होत आहे. आज काही लोक चुकीच्या मार्गाने पैसा कमावून मोठेपणा मिळवत आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणा, कष्ट आणि सचोटी यांची किंमत कमी होत चालली आहे. युवकांमध्येही “पैसा आला की सर्व काही मिळते” अशी चुकीची मानसिकता वाढताना दिसत आहे.
देशाचा आणि गावाचा खरा विकास करायचा असेल तर भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून चुकीच्या गोष्टींना विरोध केला पाहिजे. लाच देणे आणि घेणे दोन्ही चुकीचे आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. युवकांनीही समाजात प्रामाणिकपणाचा संदेश देत भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे.
कारण प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास यावरच देशाचा आणि गावाचा खरा विकास अवलंबून असतो.
पत्रकार:- तेजस वाळुंज
लोणी धामणी, ता.आंबेगाव, जि. पुणे
मोबाईल – 9503280471


