
पंचनामा विशेष – महाराष्ट्राच्या लोककला परंपरेतील एक तेजस्वी आणि जाज्वल्य नाव हरपले आहे. महाराष्ट्र राज्य शाहीर संघटनेचे अध्यक्ष, तुरेवाले शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने कलगीतुरा या लोककलेच्या विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
कलगीतुरा या पारंपरिक लोककला प्रकाराला आपल्या दमदार आवाजाने, तडफदार सादरीकरणाने आणि जंगी सामन्यांनी महाराष्ट्रभर पोहोचवणारे शाहीर म्हणून रामदास गुंड यांची ओळख होती. गावोगावी होणाऱ्या यात्रांमध्ये भगव्या पेहरावात, हातात डफ घेऊन रंगलेले त्यांचे सादरीकरण हे रसिकांसाठी पर्वणीच ठरत असे. डफावर थाप देत स्वतः रचलेली गीते सादर करताना त्यांचा आवाज आणि शब्दांची ताकद प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकत असे.
शिग्र काव्यरचना ही त्यांची विशेष ओळख होती. क्षणात कविता रचून ती प्रभावीपणे सादर करण्याची कला त्यांच्या अंगी होती. समाजातील घडामोडी, शासनाच्या विविध योजना यांवर भाष्य करणारी गाणी ते तत्काळ तयार करून रसिकांसमोर मांडत असत. त्यामुळे त्यांचे सादरीकरण केवळ मनोरंजन न राहता सामाजिक प्रबोधनाचे माध्यम बनले होते.
मात्र, सततची धावपळ, कार्यक्रमांची व्यस्तता आणि आरोग्याकडे झालेलं दुर्लक्ष यामुळेच नियतीने त्यांना आपल्यातून अकाली हिरावून घेतले.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच शाहीरविश्वात आणि रसिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
रामदास गुंड हे केवळ एक शाहीर नव्हते, तर ते लोककलेचे खरे उपासक होते. त्यांनी आपल्या कलेद्वारे समाजाला विचार देण्याचे, जागृती घडवण्याचे कार्य आयुष्यभर केले. त्यांच्या जाण्याने एक आवाज थांबला असला, तरी त्यांनी निर्माण केलेली परंपरा आणि त्यांनी दिलेली कला प्रेरणा पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
किशोर खुडे, पत्रकार (दै. पुढारी)



