आंबेगाव तालुक्यातील विविध खात्यांतील राज्य सरकारी कर्मचारी गेले संपावर!!सर्व सामान्य नागरिकांचे होणार हाल!!
आंबेगाव तालुक्यातील विविध खात्यांतील राज्य सरकारी कर्मचारी गेले संपावर!!
सर्व सामान्य नागरिकांचे होणार हाल!!
महाराष्ट्र सरकारने सर्व सरकारी कर्मचारी यांना नवीन अंशदायी निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना रद्द करुन नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. पीएफआरडीए कायदा रद्द करावा, खासगीकरण, कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, शासनाच्या सर्व विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावी,अनुकंपा तत्वावरील नियुक्ती तत्काळ करण्यात यावी अशा प्रलंबित मागण्यांकरीता आंबेगाव तालुक्यातील विविध खात्यांतील राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत.
जुनी पेन्शन लागू करण्यासाठी गेली अनेक वर्ष सरकारी कर्मचारी आंदोलन करत आहेत. मात्र सरकारच्या वेळकाढू भूमिकेमुळे तसेच मार्च २०२३ मध्ये मुख्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन पुर्ण न केल्याने तसेच बुधवारी झालेल्या बैठकीत या विषयावर तोडगा न निघाल्याने कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने दिनांक १४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संप पुकारला आहॆ.
सरकारी कर्मचारी, परिचारिका संपात सहभागी झाल्या आहेत.आरोग्य विभागातील परिचारिका या संपात सहभागी झाल्याने आंबेगाव तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे.
१४ डिसेंबर २०२३ पासून आंबेगाव तालुक्यातील राज्य सरकारी, महसूल, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, नगरपंचायत, कर्मचारी, व कंत्राटी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात घोषणा देत आंदोलन केले.जुनी पेन्शन करीता नेमलेल्या अभ्यास समितीने तिन महिन्यात अहवाल देणे अपेक्षीत असताना मुदतवाढ घेऊनही अद्याप शासनाकडून सदर समितीचा अहवाल जाहिर केला गेला नाही.
सर्व सामान्य नागरीकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या आरोग्य विभागात मोठया प्रमाणात कंत्राटी व रोजंदारी तत्वावर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जात नाही. संघटनेच्या या मागण्या केवळ आर्थिक स्वरूपाच्या नसून त्या सामाजिक गरज म्हणून मांडण्यात आल्या आहेत.आरोग्य कर्मचारी, तहसील कर्मचारी संपावर गेल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सरकारने तात्काळ संघटनेच्या मागण्या मान्य कराव्या व संप अधिक दिवस करण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा या वेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
निवासी नायब तहसीलदार अनंथा गवारी, रोहीदास सुपे,जयश्री भवारी, तुषार कोरडे, महेश पवळे, दामोदर टेमगिरे, योगेश सोनवने, रमेश बांबळे, विदया भालेराव, दिपाली कोकणे, अंकुश राश्रे , संतोष राऊत संजीव शितोळे आदी कर्मचारी संपात सहभागी होते.