
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालय व रिसर्च सेंटर, बेल्हे येथे आचार्य सुश्रुत जयंती तसेच महाकवी कालिदास दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय ज्ञानपरंपरेतील दोन महान विभूतींना अभिवादन करत विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या सुश्रुत स्तवनाचे पठण केले. संपूर्ण परिसर ज्ञान, संस्कार आणि भारतीय वैद्यकीय परंपरेच्या अभिमानाने भारावून गेला.
कार्यक्रमात डॉ. रश्मी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना आचार्य सुश्रुत आणि महाकवी कालिदास यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी आढावा दिला. त्यांनी सांगितले की, आचार्य सुश्रुत हे आयुर्वेदातील ‘शल्यचिकित्सेचे जनक’ म्हणून जगभर ओळखले जातात. त्यांनी शस्त्रक्रिया, शरीररचना आणि वैद्यकशास्त्राला अभूतपूर्व दिशा दिली. त्यांच्या सुश्रुत संहिता या ग्रंथात ३०० हून अधिक शस्त्रक्रियांचे प्रकार, १२० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया उपकरणांचे वर्णन, नाकाची पुनर्रचना, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, हाडांचे उपचार तसेच जखमांच्या उपचारांचे वैज्ञानिक विवेचन आढळते. आजही जगभरातील वैद्यकीय संशोधक या ग्रंथाचा अभ्यास करतात.
यावेळी महाकवी कालिदास यांच्या साहित्यसेवेचाही गौरव करण्यात आला. संस्कृत साहित्यातील कविकुलगुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिदास यांनी अभिज्ञानशाकुंतलम्, मेघदूतम्, रघुवंशम्, कुमारसंभवम् यांसारख्या अजरामर साहित्यकृतींची निर्मिती करून भारतीय संस्कृतीचा गौरव जगभर पोहोचविला. दरवर्षी आषाढ शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा महाकवी कालिदास दिन भारतीय साहित्य, संस्कृती आणि ज्ञानपरंपरेचा सन्मान करणारा दिवस असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे आयोजन समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी डॉ. रमेश पाडेकर, डॉ. श्रवंती तोडचिरकर, डॉ. जयश्री मते, डॉ. स्नेहल गायकवाड, डॉ. मधुसूदन कुऱ्हाडे, प्रा. मानसी गवळी, समर्थ नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य बाबासाहेब भुतकर, प्रा. आकाश क्षीरसागर, प्रा. हर्षदा शिंदे , यशवंत फापाळे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत तसेच प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी शुभेच्छा देत भारतीय ज्ञानपरंपरा, आयुर्वेद आणि संस्कृत साहित्याचा वारसा जतन करण्याचे आवाहन केले.

