
पंचनामा विशेष – मैफिल…!!
२१ वे शतक म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचे शतक !! याच शतकात अगदी काल लागलेला शोधही आज कालबाह्य होतो आहे. या तंत्रज्ञानाने शहरे झपाट्याने बदलली. सिमेंटच्या चार भिंतींच्या आत नात्याची वीण देखील सैल झाली.मोबाईल आला आणि माणसा माणसातील संवाद संपला….सगळ बदललं… पण आपलं गाव मात्र बदललं नाही गड्या !! वाचूया अशाच एका गावाची कथा अगदी थोडक्यात!!
सध्या कडक उन्हाळा सुरू आहे.डोंगरावर वसलेलं आमच शिरदाळे गाव आणि त्या गावातली माणसं उन्हाळा म्हटलं की अगदी निवांत असतात.एकदा माघ पोर्णिमा संपली की शेतीची कामे आटपलेली असतात.त्यानंतर उन्हाळाभर चार महिने मात्र आमची जेष्ठ मंडळी दुपारी धामणी वरून फेरफटका मारून आल्यावर एक एक करून जमा होतात.

नुकताच याच मंडळींनी या वडाच्या झाडाला वोटा बनवला आहे.त्याठिकाणी त्यांची मैफिल बसते.बारा एक च्या दरम्यान बसलेली बैठक चार पाच वाजेपर्यंत हमखास बसते.मग त्यात रंगणाऱ्या बैलगाड्याच्या गप्पा,सोयरीकीच्या गप्पा रंगत असतात.काही जुन्या काळातील माहीत नसलेल्या अनेक गोष्टी यांच्याकडून माहीत तर होतातच शिवाय त्यांच्या बैठकीने येणारी शोभा त्या झाडाचे सौंदर्य वाढवत असते.

याच मंडळींनी लावलेल झाड,याच मंडळींनी केलेला ओटा आणि हीच मंडळी त्या सावलीला बसून घेत असलेला आनंद पाहून मनाला मिळणारे समाधान काही वेगळच आहे.काळ बदलत चालला आहे.हल्ली बसायला,गप्पा मारायला कोणाला वेळच राहिलेला नाही.या मोबाईलच्या जमान्यात अशा मैफिली हल्ली रंगत नाहीत.मैफीली बसतात पण त्या वेगळ्या असतात.गप्पा हल्ली संपत चालल्या आहेत.
आमच्या गावची शान वाढवणारे हे जेष्ठ मंडळी आमच्या गावची शान आहे.
शब्दांकन – मयुर सरडे (निवेदक, मा. उपसरपंच शिरदाळे)


