
पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या डिंभे धरण ( हुतात्मा बाबू गेणू जलाशय) तुन उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी नवनियुक्त पंचायत समितीच्या सदस्या अंकिता अनिल वाळूंज यांनी केली आहे.
सध्या वातावरणात उन्हाचा कडाका वाढू लागला असून,आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेती पिके यामुळे सुकत असून त्यांना पाण्याची गरज आहे.यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी या परिसरातील जमिनीतील पाणी पातळी कमी होत असल्याने पाण्याचा तुटवडा जाणवु लागला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असूनही आंबेगाव तालुक्यातही अनेक ठिकाणी विहीर, कुपनलिका, तलाव यांच्या पाण्याच्या पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे.

सध्या शेतात असलेल्या शेती पिकांना पाण्याची गरज आहे. जमिनीची पाणी पातळी कमी असल्याने विहिरींची पाणी कमी होत चालली आहे तर ओढ्या-नाले कोरडे पडू लागले आहे. आंबेगावच्या पूर्व भागात व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागाला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो.
येथील शेती डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यामुळे बागायती झाली आहे.मात्र,सध्या शेतामध्ये उभ्या असणाऱ्या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी वाढली आहे. शेती पिके सुकू लागल्याने हे आवर्तन लवकर सोडावे,अशी मागणी पंचायत समितीच्या नवनिर्वाचीत सदस्या अंकिता अनिल वाळूंज व वाळूंजनगरच्या सरपंच तृप्ती महेंद्र वाळूंज व जारकरवाडीचे उपसरपंच सचिन टाव्हरे, मा.उपसरपंच शरद भोजने यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.

