पाबळ-केंदूर साठीच्या ६० कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचा उत्साहात श्रीगणेशा!
पाबळ-केंदूर साठीच्या ६० कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचा उत्साहात श्रीगणेशा!
गेली अनेक वर्ष शिरूर तालुक्यातील पाबळ, केंदुर या भागासह त्या गावाच्या वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पाऊस कमी असल्याने अनेकदा पाण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागतो. येथील लोकांची पाण्यासाठी होणारी वणवण कमी व्हावी, महिलांचा डोक्यावरचा हंडा खाली यावा हेतूने पाबळ व केंदूर गावांसाठी संयुक्तिक ६० कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर करण्यास यश आल्याची माहिती शिवसेना उपनेते, शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
मागील युती सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठका घेऊन या परिसरात कळमोडीचे पाणी यावे, त्याचा लाभ शिरूर, आंबेगाव व खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना होऊन हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली यावी यासाठी आढळराव पाटील यांनी आग्रही भूमिका मांडली होती. तसेच थिटेवाडी बंधाऱ्यात पाणी येण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यानंतर राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून या कामांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. हा महत्तवाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यासाठी आढळराव पाटील यांनी वेळ मागितली आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या विषयात आवर्जून लक्ष घालावे अशी मागणी या कार्यक्रमाच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत आढळराव पाटील यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती शासनाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यासाठी अनेक मोठमोठ्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळालेली आहे. हे सरकार लोकहितासाठीच काम करीत असून कोणतही गाव तहानलेले राहू नये, गावातील पाण्याची भटकंती थांबावी यासाठी कोट्यावधी रुपयांच्या पाणी योजना राज्य शासनाने प्राधान्याने हाती घेतल्या आहेत. आज भूमिपूजन होत असलेल्या शिरूर तालुक्यातील पाबळ-केंदूर या दोन मोठ्या गावांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी ६० कोटींची पाणी योजना लवकरात लवकर पूर्णत्वास येणार असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आंबेगाव विधानसभेचे आमदार,मा.गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी मार्गदर्शन केले.