अकोलेत भरला रानभाज्या महोत्सव!!


पंचनामा अकोले प्रतिनिधी – कोळू,कुरडू,आळु,चाई,भारंगी चिचूर्डा,बडदा,कोडवळे,पात्री,शेवगा,राजगिरा,फांदभाजी,हामद, अंबाडी,आघाडा,चितप,लोथी,भोकर, मोहटी,तेरे,अमरकंद व पुदीना आदी अति दुर्मिळ रानभाज्या विक्रीसाठी आणून अकोले शहरात अनोखा रानभाज्यांचा महोत्सव भरला.
अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील डोंगर,दऱ्या खोऱ्यांमध्ये रानभाज्यांचा रान मेव्यानी अकोले पंचायत समितीचा परिसर सध्या बहरला आहे.कोणतीही शेती न करता अथवा कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता, निसर्गतः उगवलेल्या भाज्याना ‘रानभाज्या” म्हणतात. या भाज्या जंगलासह शेताच्या बांधावर, माळरानावर उगवतात.पावसाची रिप- रिप सुरू झाली की, रानभाज्या डोलु लागतात.भाज्यांच्या चवीसह औषधी गुणधर्माची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवित नाहीत.या भाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात यामुळे रानभाज्या आवर्जून चवीने खाल्ल्या जातात.
रानभाज्याचे महत्व लक्षात यावे यासाठी आदिवासी भागातील गावामध्ये रानभाज्याचे महोत्सव भरविले जातात.अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील कळसुबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्य,रतनगड, अलग,मलग,कुलग,कोकणकडा, बिताका आदी परिसरात जून,जुलै, व ऑंगस्ट महिन्यात रानभाज्या मोठ्या प्रमाणात उगवतात.
बारी,उडदावणे,मुतखेल,राजूर, कोतुळ,अकोले शहरात आदिवासी बांधव या भाज्यांची विक्री करतात. निसर्गप्रेमी,हौशी पर्यटक व शहरी नागरिकांना माहिती नसलेल्यांना ते विविध प्रकारच्या या रानभाज्याची माहिती सांगतात.
रानभाज्या नेमकेपणाने ओळखूण, त्या खुडून आदिवासी महिला शहरी भागात बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात, मात्र या रानभाज्यांची माहिती नसल्याने फारसे कोणी विकत घेण्यास लवकर तयार होत नाही. ज्याना माहिती आहे अशीच व्यक्ती भाज्या विकत घेताना दिसतात.
रानभाज्याबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे इच्छा असुनही बाजारात त्या विकत घेतल्या जात नाहीत. यामुळे रानभाज्या विकत घेताना शक्यतो स्थानिक आदिवासी कडूनच घ्याव्यात त्यांच्याकडून रानभाज्यांविषयी अचूक माहिती मिळते या भाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या असतात. त्यांना खते वापरलेली नसतात.
यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे, आदिवासी विकासच्या प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे,प्रभारी गटविकास अधिकारी विकास चोरे, बाजार समितीचे सभापती भानुदास तिकंडे, हेरंब कुलकर्णी,एकल साऊ च्या प्रतिमा कुलकणी, पुष्पा लहामटे आदींनी रानभाज्यांचे महत्त्व समजून घेत त्या खरेदी केल्या.
कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी उमेदचे कुंदन कोरडे,सोमनाथ गुंजाळ यांनी विशेष प्रयत्न केले.
अकोले पंचायत समितीच्या आवारात आदिवासी भागातील रानभाज्याचा महोत्सव पाहुन मी अक्षरश भारावलो, चाव्या,तेरा,फांद्याची भाजी, शेवग्याच्या पानांची भाजी, कोंबडया, कोळु,चित्रुकांची भाजी मी पहिल्यांदाच पाहिली.या भाज्या कधी खाल्ल्या नव्हत्या. रान भाज्या विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, रान’भाज्या सेंद्रिय आहेत. दर गुरुवारी सर्व रानभाज्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. धावपळीच्या जगामध्ये रासायनिक खतांचा भडीमार होऊन पिकतात, परंतू आता निसर्गता पिकणाऱ्या रानभाज्या सर्वांना विकत मिळणार आहेत. या रानभाज्यांचा खवैय्यांनी लाभ घ्यावा.
-आमदार डॉ. किरण लहामटे, अकोले
