राजुरी मध्ये राष्ट्रीय सेवा योजनामार्फत श्रमदानातून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती!!
राजुरी मध्ये राष्ट्रीय सेवा योजनामार्फत श्रमदानातून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती!!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे राष्ट्रीय सेवा योजना,समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग बेल्हे व समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे (बांगरवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर राजुरी येथे १ फेब्रुवारी २०२३ ते ७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होत आहे.
शिबिराचे उदघाटन माजी सभापती दिपकशेठ औटी व सरपंच प्रियाताई हाडवळे यांच्या शुभहस्ते झाले.
या शिबिरातील विद्यार्थ्यांनी जल संवर्धन ही काळाची गरज ओळखून नियोजन बद्ध रित्या गावचे सर्वेक्षण करून बंधाऱ्यांविषयी माहिती संकलित केली.आणि डोबी डुंबरे मळयातील ओढयावर श्रमदानातून वनराई बंधारे बांधले आहेत.यामध्ये एका ओढयाला वाहते पाणी आडवून त्या ठिकाणी २०० सिमेंट च्या गोणींमध्ये वाळू भरून त्या एकमेकांवर रचत चार-पाच थर तयार करून हा बंधारा बांधला.हे बंधारे बांधल्याने पूर्वेकडून येणारे पाणी बऱ्याच अंशी अडवले जाऊन त्याचा विहिरी,बोरवेल व शेतीपूरक उद्योगधंद्यासाठी विनियोग होणार असून पूर्ण परिसर जलमय होणार आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात वावरताना आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून राष्ट्रीय सेवा योजनेतील २५० विद्यार्थ्यांनी राजुरी गावचे सर्व्हेक्षण करून या बंधाऱ्याच्या माध्यमातून जलसंवर्धन-पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्तिमंत स्वरूप प्राप्त करून दिल्याने स्थानिकांकडून कौतुक केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष व राजुरी गावचे उपसरपंच माऊलीशेठ शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,राजुरी गावच्या सरपंच सौ.प्रिया ताई हाडवळे,विशाल महाराज हाडवळे,बी सी एस चे प्राचार्य डॉ. उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,अभियांत्रिकी चे डॉ.अनिल पाटील,फार्मसी चे प्राचार्य डॉ. संतोष घुले, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर,रासेयो समन्वयक प्रा.विपुल नवले,कार्यक्रम अधिकारी प्रा.दिनेश जाधव,प्रा.बिपीन गांधी,प्रा.सचिन भालेकर,प्रा.तेजश्री गुंजाळ,प्रा. गौरी भोर,क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,बाळू हाडवळे,गोपाळ नाना हाडवळे,अशोक हाडवळे,ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ पाटील औटी,सखाराम गाडेकर,शाकिर भाई चौगुले,निलेश हाडवळे आदी मान्यवर तसेच स्थानिक शेतकरी भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्यांकडे पाहून सरपंच व स्थानिक शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.सर्व ग्रामस्थांचे या कामी विशेष सहकार्य लाभले.सर्व उपस्थितांचे प्रा.प्रदीप गाडेकर यांनी आभार मानले.