विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश!!राष्ट्रीय सेवा योजनेतून नारायण गडावर स्वच्छता!!
विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश!!
राष्ट्रीय सेवा योजनेतून नारायण गडावर स्वच्छता!!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे राष्ट्रीय सेवा योजना, समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग बेल्हे व समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे (बांगरवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर राजुरी येथे १ फेब्रुवारी २०२३ ते ७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होत आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वच्छता हीच निरोगी आणि समृद्धी जीवनाची पहिली पायरी असून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत प्रा.दिनेश जाधव यांनी व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी हातात झाडू खराटे, टिकावं, कुदळ, खोरी,घमेले, इ. प्रकारची साधन सामग्री बरोबर घेऊन पायथ्यापासून ते हस्तमाता मंदिरापर्यंत चा परिसर स्वच्छ केला.
नारायणगडावर प्लॅस्टिकच्या बाटल्या, अस्वच्छ कापडी वस्तू इत्यादींचा निचरा करण्यात आला. स्वच्छतेबरोबरच नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेत विविध प्रकारच्या वनस्पतींची माहिती देखील विद्यार्थ्यांनी घेतली.
नारायणगडावरील जैवविविधतेचा माहिती घेत सांबरकांड,गंधार,कडुलिंब टाखळ,निलगिरी,सुबाभूळ,बोरी,लळई, धावडा,मोराई,पिठवणी,मोहाची झाडे, सिताफळे,आपटा,अंजन,आवळा, आंबा,बेहडा,चंदन,चिंच,हिरडा,जांभूळ,तरवड,रानझेंडू,अडुळसा दंती, घाणेरी कोरफड, हिंगणबेट,करवंद, बेल कवठ करावी,येलतुरा,वड,फ्रेरिया इंडिया त्याचप्रमाणे नारायण गडावरील प्रसिद्ध मानली जाणारी दूधकुडा हि वनस्पती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आढळते.येथील विविध प्रकारचे पक्षी, कीटक, फुले,फळे यांचा खजिनाच या नारायणगडावर आहे.काही अंशी विषारी आणि बिनविषारी साप देखील या गडावर आढळून येतात.
यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व वनस्पती,पशुपक्षी यांची माहिती घेतली.गड दुर्ग संवर्धन काळाची गरज असल्याचे सांगत सुंदर परिसर हाच आमचा ध्यास आणि त्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू अशी घोषणा देत गड-किल्ले ही राष्ट्राची संपत्ती जतन करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी सांगितले.नारायणगडचा इतिहास आणि ऐतिहासिक ठेवा सर्वांनाच माहिती करून देण्यासाठी दरवर्षी या नारायणगडावर स्वच्छता मोहीम व प्लास्टिक मुक्त नारायण गड ही मोहीम राबवणार असल्याची माहिती कार्यक्रम अधिकारी प्रा.बिपिन गांधी यांनी दिली.