भय इथले संपत नाही!! जारकरवाडी येथील बढेकर मळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या मृत्युमुखी!!
भय इथले संपत नाही!! जारकरवाडी येथील बढेकर मळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या मृत्युमुखी!!
आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे बिबट्याची दहशत काही केल्या संपताना दिसत नाही. जारकरवाडी येथील बढेकर मळ्यातील शेतकरी श्री. वसंत खुमाजी बढेकर यांच्या गोठ्यावर बिबट्याने रविवारी (दि.4 जून) रोजी हल्ला करत पाच शेळ्यांचा फडशा पडला आहे.
बढेकर यांच्या घराच्या बाजूला त्यांचा गोठा असून गोठ्याला पंधरा फूट उंचीचे तारेचे कंपाउंड केलेले आहे.विशेष म्हणजे बिबट्याने तार कंपाऊंडच्या खाली जमीन उकरून शेळ्यांवरती हल्ला केला.या हल्ल्यात पाचही शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. यामुळे बढेकर कुटुंबीयांचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
जारकरवाडी आणि परिसरात डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी फिरल्याने बारमाही बागायती शेती तयार झाली आहे. कालव्याच्या पाण्यामुळे उसाचे क्षेत्र ही वाढले आहे. बारमाही पाणी उपलब्ध असल्याने दडन क्षेत्र वाढले आहे. याशिवाय वन्य प्राण्यांना बारमाही पाणी उपलब्ध असल्याने या परिसरात लांडगे, कोल्हे,मोर यांच्यासह बिबट्याचे ही वास्तव्य आहे. रानात शिकार न मिळाल्यास बिबट्या मानवी वस्तीत प्रवेश करत आहे. यापूर्वी देखील अनेकदा जारकरवाडी परिसरात बिबट्याने मानवी वस्तीत प्रवेश करून पाळीव प्राण्यांवरती हल्ले केले आहेत. या परिसरात ताबडतोब पिंजरे लावले जावेत आणि बिबट्यांना जेरबंद केले जावे अशी मागणी प्रगतशील शेतकरी शाम बढेकर, मा.उपसरपंच प्रदीप बढेकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश बढेकर यांनी केली आहे.
वनविभागाला या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक साईमाला गीते वनरक्षक अशोक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.