
पंचनामा प्रतिनिधी – दिग्दर्शक प्रविण तरडे यांचा ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात स्वामी समर्थांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क केले आहे. दरम्यान, ‘लोकसत्ता’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत प्रविण तरडेंनी मोहन जोशी यांच्याबद्दल एक असा धक्कादायक आणि डोळ्यात पाणी आणणारा खुलासा केला आहे, जो ऐकून संपूर्ण सिनेसृष्टी या ज्येष्ठ नटाच्या जिद्दीला सलाम करत आहे.
प्रविण तरडेंनी सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोहन जोशी यांना ‘पॅरालिसिसचा’ (अर्धांगवायू) सौम्य झटका आला होता. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता. चित्रपटाचे शूटिंग थांबण्याची आणि लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अशा गंभीर परिस्थितीतही मोहन जोशी यांनी कमालीचे धाडस आणि कामाप्रती असलेली निष्ठा दाखवली.
”त्यांच्या शरीराची एक बाजू व्यवस्थित काम करत नव्हती, बोलताना त्रास होत होता, तरीही त्यांनी ‘शूटिंग थांबवायचं नाही’ असा निर्णय घेतला आणि कॅमेऱ्याला सामोरे गेले,” असे तरडेंनी भावूक होत सांगितले. आजारपणावर मात करत त्यांनी स्वामी समर्थांचे कठीण सीन अत्यंत ताकदीने पूर्ण केले. एका खऱ्या कलाकाराची कलेप्रती असलेली ही भक्ती आणि जिद्द सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत असून नेटकरी मोहन जोशी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.


