पाबळ (ता. शिरूर) परीसरात कांदा, बटाटा, हरभरा पीक जोरात!!
पाबळ (ता. शिरूर) परीसरात कांदा, बटाटा, हरभरा पीक जोरात!!
पाबळ प्रतिनिधी – या वर्षी राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ज्याचा फायदा शेतकरी राजाला झाला आहे. पाबळ, धामारी, जातेगाव, मुखई, केंदुर या परीसरात कांदा, बटाटा, हरभरा पिके जोरात आली आहे. बटाटा, हरभरा पीक फुलोऱ्यात आले असून कांदा हे पीक ही तरारून उठले आहे.
पाबळ परीसरात कांदा, बटाटा, गहू, हरभरा, ज्वारी, मका, बीट, धना, मेथी, फरशी या पिकांची वाढ चांगली झाली असून, अजुन वातावरणात धुक्याचे प्रमाण कमी असल्याने काही प्रमाणात शिपणीचा खर्च वाचला आहे.
पाबळ आणि परीसरात या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने उभी पिके शेतातच सडून गेली होती.तसेच शेतात पाणी साठून राहिल्याने नापिकी तयार झाली होती. पण सध्या शेती वापसा योग्य झाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी पीके वाढीस लावली आहेत. ज्यात कांदा, बटाटा, हरभरा आदी पिकांचे प्रमाण जास्त आहे.
सध्या वातावरणात थंडी चे प्रमाण चांगले आहे. ही थंडी सर्वच पिकांसाठी पोषक आहे. मात्र ज्यावेळी ढगाळ वातावरण तयार होते तेंव्हा धुक्याचे साम्राज्य पसरले जाते. धुके वाढले की पिकांवर रोगराईचे प्रमाण ही वाढत जाते ज्याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादन क्षमतेवर, भांडवली खर्चावर होतो आणि बळीराजाचे आर्थिक गणित कोलमडून जाते.
पण सध्या हवामान पिकवाढीस योग्य असल्याने उत्पादन व उत्पन्न यांत चांगली वाढ होणार असल्याची भावना शेतकरी बांधवांनी पंचनामाशी बोलताना व्यक्त केली.