भीमाशंकर कारखान्यास देशातील “वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” जाहीर!!

भीमाशंकर कारखान्यास देशातील “वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” जाहीर!!
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा सन २०२३-२४ करीता “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” जाहीर झाला आहे. देशातील २०२३-२४ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची शुक्रवारी घोषणा करण्यात आली अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
“देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार” जाहीर झाल्याबाबत माहिती देताना बेंडे म्हणाले की, मूल्यमापनाच्या आधारे पुरस्कार निवड समितीने श्रेणी अंतर्गत पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्ली येथे होणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे. यापूर्वी कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १५ असे एकूण २८ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” ७ वेळा मिळविणारा देशातील एकमेव साखर कारखाना आहे. अशी माहिती व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे मा. संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.