धामणी(ता.आंबेगाव) श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात सदानंदाचा येळकोट!! चंपाषष्ठीला दर्शनासाठी व जागरणासाठी भाविकांची गर्दी!!
धामणीच्या श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात सदानंदाचा येळकोट!! चंपाषष्ठीला दर्शनासाठी व जागरणासाठी भाविकांची गर्दी!!
लोणी- धामणी- प्रतिक गोरडे- पुणे व नगर जिल्हयातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धामणी ( ता.आंबेगांव) येथील श्री म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदीरात आज मंगळवार पहाटे (दि :२९) चंपाषष्ठीच्या मूहर्तावर देवाच्या सप्तशिवलिंगाचा अभिषेक व आरती झाल्यानंतर मंदीर भाविकांसाठी खुले करण्यात आले. भाविकांच्या गर्दीने मंदीर परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.पुणे, नगर,नाशिक जिल्हयातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धामणी येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानाचे मंदिरात दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे चंपाषष्ठीला मंगळवारी पहाटे चार वाजता श्री कुलस्वामी खंडोबाच्या मूर्तीसमोरील खालच्या भागात असलेल्या स्वयंभू सप्तशिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक देवाचे परंपरागत मानकरी व सेवेकरी तांबे.भगत.वाघे मंडळी यांच्याकडून करण्यात आला त्यानंतर सप्तलिंगावर साधारण दोन फूट उंच व दिड फूट रुंद व्यासाच्या पंचधातूच्या आकर्षक मुखवट्याची प्रतिष्ठापना तांबे,भगत.या सेवेकरी मंडळीनी केली.त्यानंतर या पंचधातूच्या मुखवट्याला व देवाच्या पूर्वमुखी श्री खंडोबा ,म्हाळसाई,बाणाई,व उत्तरमुखी खंडोबाची मानलेली बहीण जोगेश्वरी यांच्या विलोभनीय भव्य मूर्तीना वस्रालंकार चढविण्यात आले.पहाटे पांचच्या सुमारास सेवेकरी दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,प्रभाकर भगत,शांताराम भगत ,राजेश धोंडीबा भगत ,दिनेश जाधव,ज्ञानेश्वर जाधव,सिताराम जाधव,देवानंद जाधव , नामदेव वीर , सुरेश वीर या सेवेकरी भगत वाघे व वीर मंडळीच्या उपस्थितीत विधीवत पूजा व महाआरती करण्यात आली.त्यानंतर देवाचे पूजारी भगत व वाघे मंडळीनी गाभार्यात सप्तशिवलिंगावर सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात भंडारा उधळला.भगत मंडळीनी पुरणपोळी,साजुक तूप,दूध खसखसीची गोड खिर, सारभात,कुरडई पापडी,असा पंचपक्वानांचा नैवेद्य देवाला अर्पण केला . त्यानंतर देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले.यावेळी धामणी, लोणी, खडकवाडी,गावडेवाडी, वडगावपीर, महाळूंगे पडवळ,तळेगांव ढमढेरे,अवसरी खुर्द,संविदणे येथील मानकरी,वाघे व वीर मंडळी, व सेवेकरी,ग्रामस्थ,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंदीरात सकाळी नऊ वाजता ह.भ. प.दिपक महाराज घोडेकर यांचे काल्याचे किर्तन झाले.या किर्तनाला आळंदी,जारकरवाडी,खडकवाडी.येथीलभजनी मंडळीनी पखवाज वीणा व टाळमृदुंगाची साथ दिली.किर्तनाची व्यवस्था सुभाष तांबे,अविनाश बढेकर व भगत वाघे मंडळीनी ठेवलेली होती चंपाषष्ठीला देवकार्याची जागरणे करण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केलेली होती.वाघे व वीर मंडळीची धावपळ होत असताना दिसत होती.पांच वर्षाचा कुमार आराध्य दिनेश जाधव वाघे मंदिरात जागरणात खंजीरी अप्रतिम वाजवत होता.त्याने यावेळी सर्व भाविकाचे लक्ष वेधून घेतलेले दिसत होते. मंदिरात पांचनामाची जागरणे सुरु असताना खंजिरी तुणतुणे व टाळाचा तसेच कासवाजवळील इतिहासकालीन घंटेचा सुमधूर आवाज मंदिराच्या आवारात घुमत होता . दरवर्षीप्रमाणे चंपाषष्ठी भंडारा उत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केलेले होते.महाप्रसादाची व्यवस्था मच्छिद्र वाघ,किसनराव रोडे,आण्णा पाटील जाधव,डाँ पाटीलबुवा जाधव,नामदेवराव जाधव,सुभाष काचोळे,सुभाष सोनवणे,प्रकाशनाना विष्णू जाधव,प्रकाशराव वरे,पंढरीनाथ खुडे यांनी पाहीली मंदिराच्या बाहेर तळी भंडाराचे.फुले व हाराचे विक्रेते बसलेले दिसत होती.चारचाकी व दुचाकी वाहनाने भाविक मोठ्या प्रमाणावर येताना दिसत होते.चंपाषष्ठीला देवकार्याची पांचनामाची जागरणे झाल्याने महीला भाविकांनी आनंद व्यक्त केला.ही सप्तशिवलिंगे म्हणजेच खंडोबाचा परिवार समजला जातो या परिवारात सप्तंलिंगे म्हणजेच म्हाळसाई,बाणाई,हेगडे प्रधान, जोगेश्वरी,काळभैरवनाथ,,घोडा व कुत्रा असे मानले जाते. खंडोबाच्या कुलधर्माच्यावेळी घरातील देवघरात बसविलेल्या घटाला पुरणपोळीचा नैवेद्याबरोबर ठोंबरा ( जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालून करण्यात येतो) कणकेचा रोडगा,वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसून यांचाही नैवेद्य खंडोबाला अर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो त्याला तळीभंडार असेही म्हणतात एका ताम्हणात विड्यांची पांच पाने,त्यावर पांच नाणी व पाच सुपार्या ठेवतात . त्याचप्रमाणे खोबर्याच्या वाट्या व भंडार ठेवतात. मग घरातील पाच,सात,किंवा अकरा अशा संख्येमध्ये घरातील मंडळी ताम्हण वर उचलून “सदानंदाचा येळकोट.भैरवनाथाचे चांगभलं व अंबाबाईचा उदे उदे असा पुकारा करीत ते ताम्हण तीनवेळा मग ताम्हण खाली ठेवून घरातील सर्वाना भंडार लावतात.व तो देवाचा भंडार जयघोष करुन घरात व घराच्या परिसरात श्रध्देने उधळण्यात येतो सर्वाना पानसुपारी खोबरे दक्षिणा देऊन त्यानंतर दिवटी बुधली घेऊन खंडोबाची आरती करतात . यालाच तळी भरणे असे म्हणतात.असे यावेळी भगत वाघे मंडळीनी सांगितले. देवाच्या कुत्र्याची आख्यायिका भगवान श्रीकृष्ण गोकुळात नंदाच्या घरी असताना त्यांच्या घरी चंपाषष्ठीचे नवरात्र सुरु होते . खंडोबाला रोडग्याचा व वांग्याच्या भरीताचा नैवेद्य दाखवायचा होता परंतु कान्हा कृष्णाने खंडोबा देवाची थट्टा करण्यासाठी घरातील लोकांचा डोळा चुकवून तो नैवेद्य खाऊन टाकला त्यामुळे रागावलेल्या खंडोबाने श्रीकृष्णाला कुत्रे बनविले . त्यानंतर नंदराजा यशोदामाई व सगळे देवघरात जमले श्रीकृष्ण कुठेच दिसत नव्हता त्यावेळी ते कुत्रे तिथेच घुटमळत होते सर्वजण चिंतेत पडल्यावर त्या ठिकाणी येऊन नारदमुनींनी येऊन खरा प्रकार सांगितल्यानंतर मग नंदराजा त्या कुत्र्याला घेऊन जेजूरीला आले त्यांनी खंडोबाचे दर्शन घेतले त्यामुळे प्रसन्न झालेल्या खंडोबाने प्रत्यक्ष दर्शन देऊन त्या कुत्र्यांचा पुन्हा श्रीकृष्ण केला त्यावेळी श्रीकृष्णाने खंडोबाला प्रार्थना केली ज्याप्रमाणे तू मला कुत्रा बनवून तुझ्या सामर्थ्याची आठवण करुन दिलीस त्याप्रमाणे तुमच्या इतर भक्तांना जागृत करण्याचे काम माझ्याकडून व्हावे त्यावर खंडोबा तथास्तू म्हणाले श्रीकृष्णाने खंडेरायाचे गुणगान करीत पहिले पाचनामाचे जागरण घातले त्याचप्रमाणे आदिमा या म्हाळसाईसाठी गोंधळही घातला आजही खंडोबाचे भाविक वाघे गोंधळी व कुंभार मंडळीना बोलावून जागरण गोंधळ घालतात घरात लग्न व धार्मिक शुभकार्ये झाल्यानंतर परंपरेनुसार आपल्या घरी अथवा खंडोबाचे मंदिरात जागरण गोंधळ घालतात त्यामुळे तेव्हापासूनच चंपाषष्ठीला पांच नामाची जागरणे घालण्याची परंपरा असल्याचे वाघे व भगत तांबे मंडळीनी यावेळी सांगितले.