आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

धामणी (ता.आंबेगाव) येथे अक्षयतृतीयेला खंडोबाची अष्टगंधउटी व नागीणीच्या पानाच्या लेपाची पूजा संपन्न!!

धामणी (ता.आंबेगाव) येथे अक्षयतृतीयेला खंडोबाची अष्टगंधउटी व नागीणीच्या पानाच्या लेपाची पूजा संपन्न!!

पंचनामा लोणी प्रतिनिधी – धामणी (ता.आंबेगाव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरामध्ये
अक्षयतृतीयेला अष्टगंधउटी व नागीणीच्या पानाची लेपन पूजा उत्सव साजरा करण्यात आला.

अक्षयतृतीयेला हा अष्टगंधउटी व पान उत्सव साजरा केला जातो असल्याचे सांगण्यात आले. पहाटे सुवासिक अष्टगंधाच्या उटीने सजवलेले स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या मुखवट्यावर करण्यात आलेला सुवासिक अष्टगंधाचा लेप स्वयंभू सप्तशिवलिंगाच्या पाठीमागे असलेल्या म्हाळसाकांत खंडोबा,म्हाळसाई व बाणाईच्या सजवलेल्या विलोभनीय सर्वांगसुंदर मूर्ती,सुवासिक फुलांच्या व अत्तराच्या सुंगधाने दरवळून गेलेला धामणीच्या कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिर परिसर,कपाळभर अष्टगंध उटी व भंडारा लावून हरिनामाचा जयघोष करणारे सेवेकरी आणि आबालवृध्द भाविक महिलाचा सहभाग हे सारे भक्तिमय वातावरण वासंतिक अष्टगंधउटी व पान पूजा सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने धामणी (ता.आंबेगाव) येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात बुधवारी भल्या पहाटे पहाण्यास मिळाले.

चैत्र महिण्यात उन्हाचा दाह वाढू लागलेला असल्यामुळे तिव्र उन्हापासून देवाला शीतलता मिळावी यासाठी चैत्री पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यत चंदनउटी,अष्टगंधउटी,पान फळ पूजा घालण्याची परंपरा आहे.महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्राच्या ठिकाणच्या देवस्थान मंदिरामधून देवाच्या मूर्तीला चंदन उटी,अष्टगंधउटी,फळपूजा भक्तिमय वातावरणात साजरी केली जाते.

यंदाही उटीचंदनाचा व उटीच्या भजनाचा गुडीपाडव्यापासून प्रारंभ झालेला आहे. अष्टगंधउटी व पान पुजा सोहळ्याच्या दिवशी धामणीच्या पुरातन खंडोबा मंदिरात टाळमृदंगाच्या गजराने व हरी नामाच्या जयघोषाने मंदिर व परिसरात आनंदी वातावरण दिसून आले.चैत्र शुध्द प्रतिपदा ते जेष्ठ शुध्द दशमी या कालावधीत चंदनउटी,अष्टगंधउटी व पान फळ पूजेचे कार्यक्रम ग्रामीण व शहरी भागात केले जातात.

धामणी येथील खंडोबा देवस्थान मंदिरात अक्षयतृतीयेच्या दिवशी पहाटे पाच वाजता खंडोबाच्या अवसरी खुर्द येथील मानाच्या काठीचे मानकरी सोमनाथ राजगुरु व सौ आशा राजगुरु,खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके व सौ लता डोके,खडकवाडीचे माजी सरपंच काशिनाथ वाळुंज व सौ मंगल वाळूंज,पुणे जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी किसनराव वाळूंज व सौ सुरेखा वाळूंज,वाळूंजनगरचे अशोक वाळूंज व सौ निर्मला वाळूंज,शिशिर बढेकर व सौ रुपाली बढेकर,सदाशिव गाढवे व सौ सविता गाढवे,धामणीचे माजी उपसरपंच नारायण नवले व सौ विमल नवले,दगडूभाऊ करंजखेले व सौ हिराबाई करंजखेले.अजय राजगुरु व सौ ज्योती राजगुरु (भराडी)शिवाजी पंचरास व सौ जया पंचरास या अकरा दाम्पंत्याच्या हस्ते सप्तशिवलिंगाला दुग्धाभिषेक त्यानंतर पंचामृताने रुद्राभिषेक वसंतपूजा करून अष्टगंधउटी व पानपूजा उत्सवाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर महाआरती झाल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,शांताराम भगत,पांडुरंग भगत,प्रभाकर भगत,धोंडीबा भगत,राहूल भगत,राजेश भगत,प्रमोद देखणे,अनिरुध्द वाळूंज यांनी सप्तशिवलिंगावर अष्टगंधउटी घालण्यास सुरुवात केली. उष्म्याची दाहकता कमी करण्यासाठी मंदिराच्या गाभार्‍यात व सभामंडपात फुलांचे हार तसेच झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली होती.मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आलेली दिसून आली.मंदीराचे आवारात व सभोवताली पहाटेच्या सुमारास सडा,रांगोळी करुन आकर्षक रांगोळ्या काढल्याचे दिसून आले.

सप्तशिवलिंगाची षोडशोपचार पूजा करुन झाल्यानंतर पहाटेच्या चांदण्याच्या साक्षीने उटीभजन गायला सुरुवात झाली.या उटीभजनातून केलेल्या निर्मळ भक्तीला वासंतिक उटी म्हटले जाते असे येथील भजनी मंडळीनी सांगितले.पहाटे मंदिरात सप्तशिवलिंगाचा अभिषेक पूजा झाल्यानंतर उपस्थित सेवेकरी ग्रामस्थ व भाविकांच्या कपाळाला अष्टगंधउटी लावण्यात आली.वासंतिक अष्टगंधउटी व पान पुजा या भक्तीमय रसाळपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.अष्टगंधउटी व पान पूजा उटीभजनामुळे व पारंपारिक वाद्याच्या निनादाने देवस्थान व परिसरातील वातावरण आपोआप आध्यात्मिक उर्जेने ढवळून निघाल्याचे दिसून आले. अष्टगंधाच्या उटीने उन्हाचा दाह आणि हरीनामाच्या भजनाने आत्मीक शीतलता निर्माण होण्यास मदत होते असे यावेळी भाविक मंडळीनी सांगितले.

पहाटेच्या वसंत पुजेचे पौरौहित्य प्रमोद देखणे गुरुजी यांनी केले.वैशाख महिण्यातील अक्षयतृतीयेच्या निमित्ताने खंडोबाचे दर्शनासाठी व तळीभंडारासाठी महाळूंगे पडवळ,गावडेवाडी,अवसरी,लोणी,खडकवाडी,संविदणे,कवठे,पाबळ,तळेगांव ढमढेरे येथील भाविक आलेले होते.मंदिराच्या बाहेर तळीभंडार व फुलांची दुकाने दिसत होती.उन्हाळ्याची तिव्रतेमुळै चारचाकी व दुचाकीने भाविक मोठ्या प्रमाणावर येताना दिसत होते.

अक्षयतृतीयेला अष्टगंधउटीची सार्थकता!!

बुधवारी आलेली अक्षयतृतीया ही माणसाच्या पत्रिकेतील गुरु आणि शनि हे ग्रह हे जणू एकमेकांशी जणू विचारविनिमय करुन माणसाला आहे त्या परिस्थितीत संभाळून नेण्याचा प्रयत्न करत असतात.शनि हे कर्म आहे आणि गुरु ही श्रध्दा आहे त्यामुळेच या दोहोंचा मेळ घालत माणसाने जीवनात वाटचाल करावी.अक्षयतृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही.या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते. अस या यंदाच्या अक्षयतृतीयेचे गर्भित आहे.त्यामुळेच या अक्षयतृतीयेच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व असल्यानेच या दिवशी धामणीच्या स्वयंभू सप्तशिवलिंगाला अष्टगंधऊटी व पान पूजा घालण्यात येते असे सेवेकरी मंडळीनी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.