महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न!!
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न!!
————–
कोल्हापूर :महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही शासनाची स्वायत्त संस्था असून १ जुलै १९५३ रोजी राज्य सरकारने राज्यातील कामगार वर्गाचे हित लक्षात घेऊन या संस्थेची स्थापना केलेली आहे.या संस्थेचा ७१ वा वर्धापन दिन नुकताच, पांडूरंग माने सांस्कृतिक हॉल फुलेवाडी, कोल्हापूर येथे संगीतमय वातावरणात संपन्न झाला.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने, राज्यातील ज्या आस्थापना, दुकाने, मॉल्स, पेट्रोल पंप, साखर कारखाने, वर्तमानपत्र कार्यालये, यंत्रमाग व्यावसायिक, चांदी व्यवसायिक, कापड दुकाने, हॉटेल्स, मेडिकल स्टोअर्स अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी, ५ पेक्षा जास्त कामगार कार्यरत असतात, त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या तसेच पाल्यांच्या सर्वांगीण व उन्नती व प्रगतीकरीता अविरतपणे विविध योजना व उपक्रमात उपक्रम राबविल्या जातात.
यावेळी जिल्ह्यातील नोंदीत कामगारांना गत वर्षी दिलेल्या आर्थिक मदतीचा आढावा, कामगार कल्याण अधिकारी विजय शिगाडे यांनी उपस्थित सर्वांना सांगितला. तसेच उपस्थित सर्वांना मंडळाच्या योजना व उपक्रमांचे माहिती पत्रक दिले.
त्याचबरोबर यापुढील काळातही मंडळाच्या योजना व उपक्रमांचा लाभ जिल्ह्यातील अनेक संस्थांनी तसेच कामगारांनी घ्यावा याकरिता, गतवर्षी ज्यांनी आर्थिक लाभ घेतलेला आहे, अशा प्रमुख ५० आस्थापनांना प्रतिकात्मक धनादेश दिले.
सदर वर्धापन दिनाचे औचित्य साधून, मंडळाच्यावतीने, श्री स्वामी समर्थ ग्रुप प्रस्तुत “स्वरगंध” या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध मराठी गीतांच्या माध्यमातून उपस्थित सर्व आस्थापना अधिकारी तसेच कामगार वर्गाचे मनोरंजन केले.
यावेळी मंडळाचे माजी सदस्य व राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी, मंडळाच्या मागील व चालू कार्याविषयी थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती विषद करून उपस्थित सर्वांना समाजाभिमुख कार्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले व वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यवस्थापनाच्या वतीने मा. पाटील तसेच सर्जेराव हळदकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व रोपाला पाणी घालून तसेच ओमकार स्वरूप या भक्तीमय गीताने करण्यात आली.
वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्वांनी, मंडळाचे कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी जिल्ह्यातील विविध आस्थापनांचे व्यवस्थापकीय अधिकारी, संघटना प्रतिनिधी, गुणवंत कामगार, विविध क्षेत्रात कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते, विविध क्षेत्रात काम कार्यरत असणारे कामगार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कल्याण निरीक्षक राजेंद्र निकम यांनी केले तर, आभार सचिन आवळेकर यांनी मानले. सदर वर्धापन दिन कार्यक्रम यशस्वी होणेकरीता गट कार्यालय कोल्हापूरचे सर्व केंद्र संचालक, सर्व कामगार – कर्मचारी आदींनी विशेष योगदान दिले.