आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात बटाटा काढणीला वेग मात्र मजूर टंचाईने उत्पादक शेतकरी आला मेटाकुटीला!!

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात बटाटा काढणीला वेग मात्र मजूर टंचाईने उत्पादक शेतकरी आला मेटाकुटीला!!
आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात बटाटा काढणीला सुरुवात झाली आहे.मजूर टंचाईमुळे बटाटा काढणीसाठी मजूर मिळवण्यासाठी शेतकर्यांची दमछाक होत आहे.
अजूनही काही शेतकरी यंत्राच्या साह्याने बटाटा काढण्याऐवजी आपल्या बैल जोडीच्या साह्याने लाकडी नागरीने बटाटा काढणी करत आहे. बटाटा लागवड करताना अनेक शेतकरी सरी पद्धतीने बटाटा लागवड करतात.त्यामूळे बटाटा पिकाची चांगली वाढ होते.परिणामी उत्पादनात चांगली वाढ झाली आहे.
काढणी झालेल्या बटाट्याला बाजारात प्रति दहा किलोला १२० ते १३० रुपये बाजारभाव मिळत आहे.तर मॉलमध्ये बटाट्याची प्रतवारी पाहून प्रति दहा किलोस १७० ते १९० रुपये बाजार मिळत असल्याचे निरगुडसर येथील प्रगतशील शेतकरी गोरक्ष टाव्हरे यांनी सांगितले.
बटाटा लागवडीपासून ते काढणी पर्यंत बटाटयाची चांगली काळजी घेतली तर चांगले उत्पन्न मिळत असल्याने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पण बाजारभावात होणारचा चढउतार्याने बटाटा उत्पादक शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्याच्या पूर्वभागातील निरगुडसर,काठापुर बुद्रुक,पोंदेवाडी,अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी, मेंगडेवाडी, जारकरवाडी,पारगाव,लाखणगाव, देवगाव व खडकवाडी परिसरात दोन्ही हंगामासाठी बटाटा लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.बटाटा पीक नगदी पीक म्हणूनही पाहिले जाते. बटाटा पीक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च येतो.बटाटा बियाणांच्या एका कट्ट्यापासून १५ ते २० पिशवी गळीत म्हणजे बटाटा उत्पादन निघाले एका पिशवीचे ५० ते ५५ किलो वजन भरत आहे.बटाट्याचे पीक घेत असताना बटाटा लागवडी पूर्वी नांगरट करून प्रती एकरी दोन ट्रॉली कोंबड खत,शेनखत टाकून सरी पद्धतीने बटाटा लागवड केली जाते.लागवडी नंतर ९० दिवसाने बटाटा काढणीला सुरुवात केली जाते.
निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथे शेतात सुरू असलेली बटाटा काढणी.