आंबेगाव तालुक्यातील धामणीच्या खंडोबा देवस्थानाला येणाऱ्या भाविकांना आता मिळणार शुद्ध पाणी!!
आंबेगाव तालुक्यातील धामणीच्या खंडोबा देवस्थानाला येणाऱ्या भाविकांना आता मिळणार शुद्ध पाणी!!
धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात भाविकांसाठी अँक्वाचा शुध्द पिण्याच्या पाण्याचा प्लॅट भोसरी व चाकण येथील जागृती टेक्निकल सर्व्हिसेस ग्रुपच्या वतीने माघ शुक्ल पक्ष श्री गणेश जयंती(अंगारकी योग प्राप्त विनायकी चतुर्थी) वार मंगळवार (दिनाक १३/२/२०२४ )रोजी श्री गणेश जयंतीच्या मुहर्तावर म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानाला अर्पण करण्यात आला असल्याचे ग्रामस्थ व सेवेकरी मंडळीनी सांगितले.
यावेळी कुलदैवत खंडेराय व श्री मयुरेश्वर गणेशाचा यज्ञ (गणेशयाग) मोठ्या उत्साहात पार पडला.
भोसरी व चाकण औद्योगीक क्षेत्रातील ( एम.आय.डी.सी भोसरी) जेष्ठ उद्योजक श्री व सौ मारुतराव कौटकर,श्री व सौ रावसाहेब साळुंके,श्री व सौ प्रदीपराव मोरे आणि श्री व सौ राहूल बेंद्रे या यजमानाच्या हस्ते गणेशयाग धामणी येथील खंडोबा मंदिरात आयोजित करण्यात आलेला होता.पहाटे सप्तशिवलिंगाचा अभिषेक व महाआरती झाल्यानंतर या गणेशयागाला सुरुवात करण्यात आली.या संपूर्ण महायज्ञाचे पौरोहित्य येथील वेदशास्त्रसंपन्न राहूल देशपांडे गूरुजी यांनी केले.
श्री मारुती कौटकर व त्यांच्या उद्योजक सहकार्यांनी यापूर्वी येथील खंडोबाच्या आवारातील पूर्वमूखी श्री मयुरेश्वर गणेश मंदिर उभारणीसाठी मोठं सहकार्य करुन आणि पंढरपुर येथून सर्वांगसुंदर श्री गणेशाची मूर्ती आणून धार्मिक कार्यक्रम करुन प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे.
उद्योजक श्री मारुती कौटकर.श्री रावसाहेब साळूंके,प्रदीपराव मोरे व श्री राहूल बेंद्रे यांनी मागील वर्षी (३/११/२३)ला म्हाळसाकांत व गणेश यज्ञ आयोजित केलेला होता त्यावेळी त्यांनी श्री खंडोबा मंदिर जिर्णोध्दारासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते.त्यानुसार त्यांच्या जागृती टेक्निकल ग्रुपच्या वतीने देवस्थानाला कुलधर्म कुलाचारासाठी व दर्शनासाठी येणार्या भाविकांसाठी पिण्याचे शुध्द पाणी पिण्यासाठी अँक्वा जेटी RO प्लँन्ट रुपये दोन लाख खर्च करुन कार्यान्वित केलेला असून त्या शुध्द पाण्याच्या प्रकल्पाचे उदघाटन काळूस (ता .खेड) चे मा. सरपंच दत्तात्रय कौटकर व रूपेश कौटकर यांच्या हस्ते गणेशजयंतीला करण्यात आले.
धामणी येथील कुलस्वामी खंडोबा देवस्थानाला मोठे महात्म्य असून श्री मल्हारी मार्तड जेजूरीहून बाणाईच्या चंदनापुरीला जाताना या निवडुंगाच्या बेटात स्थानापन्न झालेले असून या देवस्थानाला संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम महाराज यांचा पदस्पर्श लाभलेला असल्याने सर्वव्याधीहर जागृत देवस्थान असून या निसर्गरम्य देवस्थानाच्या ठिकाणी श्री गणेश जयंतीला महायज्ञ आयोजित करणे हे भाग्यवर्धक असल्याचे वेदमूर्ती राहूल देशपांडे गुरुजी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी देवस्थानाच्या वतीने खंडोबा देवस्थानाचे मुख्य पुजारी दादाभाऊ भगत यांनी मारुती कौटकर,रावसाहेब साळुंके,प्रदीप मोरे ,राहूल बेंद्रे मा. सरपंच दत्तात्रय कौटकर, जेटीएस ग्रुपचे अकबर इनामदार यांचा मानाचा फेटा व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश पाटील जाधव,देवस्थानाचे सेवेकरी शांताराम भगत,सुभाष तांबे,प्रभाकर भगत,धोंडीबा भगत,पांडुरंग भगत,खंडू भगत,राहूल भगत,राजेश भगत,सिताराम जाधव वाघे,दिनेश जाधव,सुरेश पवार,मच्छिंद्र रोकडे उपस्थित होते.