बेल्हे-जेजुरी,अष्टविनायक महामार्ग आणि त्यांना जोडणारे रस्ते कचरा कुंडीचे अड्डे??


संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी तसेच अष्टविनायक यात्रा सोपी व्हावी,भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा या हेतूने बांधण्यात आलेल्या या दोन्ही मार्गामुळे भाविकांना देवदर्शन सुलभ झाले आहे.मात्र या मार्गाच्या दुतर्फा खोदलेल्या चरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
जेजुरीचा खंडोबा,अष्टविनायक यात्रा, रांजणगाव येथील देशातील सर्वात मोठी पंचतारांकित एम.आय.डी. सी., भीमाशंकर सहकारी साखर कारखाना,विघ्नहर सहकारी साखर कारखाना,पराग साखर कारखाना,मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, भीमाशंकर ज्योतिर्लिंग,आंबेगाव,शिरूर तालुका जोडणारा रस्ता अशी अनेक दुवास्थाने जोडणारा रस्ता म्हणून या दोन्ही मार्गांची ओळख झाली आहे. रस्ता रुंदीकरण दरम्यान मार्गाच्या दोन्ही बाजूला खोदलेले चर तसेच या मार्गाला जोडले जाणारे अनेक रस्ते देखील कचऱ्याचे अड्डे बनले आहेत.
पोंदेवाडी फाटा ते मलठण या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मेलेल्या कोंबड्या, दारूच्या बाटल्या,प्लास्टिक कचरा कुजलेल्या वस्तू यांचे मोठ्या प्रमाणात ढीग पडलेले दिसून येतात.सविंदणे फाटा,पोंदेवाडी फाटा ते वैदवादी फाटा येथे वन विभागाच्याहद्दीनजीक मोठ्या प्रमाणात मेलेल्या कोंबड्या टाकल्या जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी प्लास्टिक गोण्यांमध्ये तर काही ठिकाणी मोकळ्या स्वरूपात मेलेल्या कोंबड्या टाकल्या जात आहेत.विशेष म्हणजे या कचऱ्याला व मेलेल्या कोंबड्याना पांढऱ्या रंगाच्या अळी सारखे किटाणू लागले आहेत.त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार सध्या या मार्गावर सुरू आहे.

महामार्गालगत असणारे हे कचऱ्याचे ढीग नक्की हलवायचे कुणी? याची नक्की जबाबदारी स्थानिक प्रशासनाची की रस्ते विकास महामंडळाची? वन विभागाच्या हद्दीनजिक टाकल्या जाणाऱ्या या दुर्गंधीयुक्त कचऱ्याची नक्की विल्हेवाट लावणार कोण? या आणि अशा अनेक समस्यांना उत्तर देणार तरी कोण? असे अनेक प्रश्न या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडले आहेत. मात्र या समस्या दूर करणार कोण? हाही एक यक्ष प्रश्न आहे.